कोकणाला 200 कोटींचं पॅकेज द्या, औषधांच्या टेंडरमध्ये घोटाळा, मुख्यमंत्र्यांचा पिकनिक दौरा; नारायण राणेंचे प्रहार

| Updated on: May 26, 2021 | 12:30 PM

भाजपचे खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावर जोरदार टीका केली आहे. (narayan rane demand 200 cr package for cyclone tauktae hits konkan)

कोकणाला 200 कोटींचं पॅकेज द्या, औषधांच्या टेंडरमध्ये घोटाळा, मुख्यमंत्र्यांचा पिकनिक दौरा; नारायण राणेंचे प्रहार
नारायण राणे, केंद्रीय मंत्री
Follow us on

मुंबई: भाजपचे खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा पिकनिक दौरा असल्याची टीका करतानाच कोकणाला 200 कोटींचं पॅकेज देण्याची मागणी नारायण राणे यांनी केली. (narayan rane demand 200 cr package for cyclone tauktae hits konkan)

नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी प्रदीर्घ चर्चा केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर टीका करतानाच राज्यातील विविध प्रश्नांवरही भाष्य केलं. मागच्या वेळी सिंधुदुर्गाला 25 कोटी रुपये जाहीर करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात सिंधुदुर्गाला 50 लाख रुपयेच मिळाले. आता पुन्हा मुख्यमंत्री कोकणात आले. लोकांनाही भेटले नाही. काही तासांत मातोश्रीवर आले. नुसता पिकनिक दौरा होता. दोन दिवसात कोकणवासीयांना मदत जाहीर करू असं म्हणाले. अजून मदत जाहीर केली नाही. कोकणाला 200 कोटींचं पॅकेज जाहीर झालं पाहिजे, अशी मागणी राणे यांनी केली.

80 हजार लोकांचा मृत्यू

या सरकारच्या तिजोरीत देण्यासारखं काही नाही. कोरोनामुळे 80 हजाराच्यावर लोकं मरण पावली आहेत. यांच्याकडे लसही नाही. ऑक्सिजन नाही आणि व्हेंटिलेटरही नाही. हे लोक टेंडरसाठी पैसे खातात. यांची मला ए टू झेड माहिती आहे. कोरोनाच्या औषधासाठी काढण्यात आलेल्या टेंडरमध्ये मोठा घोटाळा झाला आहे, असा आरोप त्यांनी केला.

मुख्यमंत्री लायक नाही

राज्यासाठी हे मुख्यमंत्री लायक नाहीत. त्यांच्या कोकण दौऱ्यातून काहीही निष्पन्न झालं नाही. दुष्काळ, अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात घरोघरी जावं लागतं. पंचनामे करावे लागतात, असा टोला लगावतानाच मुख्यमंत्री ज्या विमानतळावर उतरले ते विमानतळ आधी सुरू करा. ज्या विमानतळाला परवानगी नाही, त्या ठिकाणी मुख्यमंत्री उतरतातच कसे?, असा सवाल त्यांनी केला.

मुख्यमंत्र्यांना नारळपाणी दिलं असतं

मुख्यमंत्री चिवला बीचवर आले होते. तिथे माझं घर आहे. राणेंचं घर कसं दिसतं हे बघायला आले असतील. ते चिवला बीचवर येणार आहेत हे माहीत असतं तर मी थांबलो असतो. त्यांना घरी बोलावून नारळपाणी दिलं असतं, असा चिमटाही त्यांनी काढला.

मातोश्रीवर भुताटकी

यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली. राऊत नेहमी राज्यपाल आणि पंतप्रधानांवर टीका करतात. ही पदे घटनात्मक आहेत. त्यांचा सातत्याने अपमान केला जातो. आधी सरकारच्या झालेल्या कामांची प्रतिक्रिया घ्या. कुणाला हनुमान बनवायचं आणि कुणाला गणपती करायचं हे तुम्ही करता, अशी टीकाही त्यांनी केली. राज्यात जर कुठे भुताटकी असेल तर ती मंत्रालय, वर्षा आणि मातोश्रीवर आहे. तेथे शांती करा. मन शांती करा, असं सांगतानाच राऊतांची भाषा ही योग्य नाही. राज्यकर्त्यांना शोभणारी ही भाषा नाही, असंही ते म्हणाले.

मराठा आरक्षणाला मुख्यमंत्रीच जबाबदार

यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर टीका केली. मराठा समाजाला आरक्षण न मिळण्यास राज्य सरकार जबाबदार आहे. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जबाबदार आहे. ऊठसूठ केंद्राकडे बोट दाखवणं योग्य नाही, असंही ते म्हणाले. (narayan rane demand 200 cr package for cyclone tauktae hits konkan)

 

संबंधित बातम्या:

‘श्रीमंत मराठ्यांना एक टक्काही आरक्षण नको, पण बहुजनांना जो न्याय, तोच गरीब मराठ्यांनाही द्या’

उजनीचा पाणीप्रश्न पेटला, जयंत पाटलांच्या पुतळ्याचे दहन, पवारांच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ

Photo: जेव्हा विलासराव गोपीनाथरावांसोबतही ‘शेजारधर्म’ पाळायचे!

(narayan rane demand 200 cr package for cyclone tauktae hits konkan)