सिंधुदुर्ग: भाजपचे नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर हल्ला केला आहे. राज्यात कोरोनामुळे एक लाख तीस हजार लोकांचा मृत्यू झाला. त्याची चर्चा होत नाही. मुख्यमंत्र्यांना त्याचं गांभीर्य नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही. राज्याचे मुख्यमंत्री कॅबिनेटला जात नाहीत. पत्रकार परिषद घेत नाही. अधिवेशनही अल्पकालावधीचं घेतात. शरद पवार यांना असा मुख्यमंत्री कसा चालतो?, असा सवाल भाजप नेते नारायण राणे यांनी केला आहे. (narayan rane raise questions on cm uddhav thackeray leadership)
नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाच हा सवाल केला आहे. लोकसभेचं अधिवेशन हे 19 जुलै ते 13 ऑगस्टपर्यंत होणार आहे. महाराष्ट्रात मात्र फक्त दोनच दिवसांचं अधिवेशन घेण्यात आलं आहे. हे राज्याचं अधिवेशन नसून केवळ तीन पक्षांचं अधिवेशन आहे, अशी टीका राणेंनी केली.
महाराष्ट्रातले जटील प्रश्न आहेत. गंभीर प्रश्न असताना सरकार दोन दिवसांचं अधिवेशन घेऊन पळ काढत आहे. अधिवेशनाच्या आधी मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेत असतात. ते मात्र पळून गेले. त्यांना कोणतंही गांभीर्य नाही. त्यामुळेच दोन दिवसांचं अधिवेशन ठेवलं आहे. एका बाजुला स्वत:ला वाघ म्हणवून घ्यायचं आणि दुसरीकडे कोल्ह्यासारखा पळ काढायचा, असा हल्लाबोलही त्यांनी केला.
आमदारांच्या निलंबनावरूनही राणे यांनी मोठं विधान केलं. सरकार वाचवण्यासाठी त्यांनी 12 आमदारांना निलंबित केलंय. त्यांनी आमच्या बारा आमदारांचं निलंबन केलं असलं तरी त्यांचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहे, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
स्वप्निल लोणकरने आत्महत्या केली. त्याला नोकरी मिळाली असती तर तो आज जिवंत असता. त्याच्या मृत्यूला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जबाबदार आहेत, असा आरोपही त्यांनी केला. लोणकर याच्या मृत्यूनंतर हे सरकार आणखी किती जणांच्या मृत्यूची वाट पाहत आहे, असा सवालही त्यांनी केला.
ओबीसींचा इम्पिरीकल डेटा केंद्र सरकारने दिला नाही म्हणून अधिवेशनात ठराव करता मग मोदींशी 50 मिनिटं कसली चर्चा करत होता? आपल्या घरातील सदस्यांवर, पक्षातील नेत्यांवर कारवाई करू नका म्हणून ही चर्चा होती का? असा सवाल त्यांनी केला. हे सरकार फक्त आदित्य ठाकरेंसाठी चाललं आहे. आदित्य सांगेल त्याच फायलीवर मुख्यमंत्री सही करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
तुमचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याची चर्चा आहे, असं राणे यांना विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली. असं काही घडत असेल तर मी आभार मानतो. तुमच्या तोंडात साखर पडो. अधिकृत पत्रं येत नाही आणि जोपर्यंत शपथ घेत नाही, तोपर्यंत जरा धीर धरा, असं राणे यांनी हसत सांगितलं. (narayan rane raise questions on cm uddhav thackeray leadership)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 5 July 2021 https://t.co/O0EiZA3kdM #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 5, 2021
संबंधित बातम्या:
Monsoon Session Live Updates | भाजपचे बारा निलंबित आमदार राज्यपालांना भेटणार
भाजपचे निलंबित आमदार दाद मागण्यासाठी राज्यपालांना भेटणार; ठाकरे सरकारची तक्रार करणार
(narayan rane raise questions on cm uddhav thackeray leadership)