तुमच्या सर्व कुंडल्या माझ्याकडे, आम्ही मागे लागलो तर झोप लागणार नाही; नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार

| Updated on: Nov 27, 2020 | 8:15 PM

आम्हाला नका सांगू हात धुवून मागे लागू. कोण कोणाच्या मागे लागेल हे लवकरच कळेल. | Narayan Rane

तुमच्या सर्व कुंडल्या माझ्याकडे, आम्ही मागे लागलो तर झोप लागणार नाही; नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार
Follow us on

सिंधुदुर्ग: तुम्ही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत. आम्ही तुमच्या मागे लागलो तर तुमच्यासाठी अवघड परिस्थिती निर्माण होईल, अप्रत्यक्ष इशारा विरोधकांना देणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray ) यांच्यावर नारायण राणे (Narayan Rane) यांनी टीकास्त्र सोडले आहे. मोदी साहेबांना आणि अमित शाहांना धमक्या देऊ नका, आम्ही येथे समर्थ आहोत. तुमच्या सर्व कुंडल्या माझ्याकडे, आम्ही मागे लागलो तर झोप लागणार नाही, असा पलटवार नारायण राणे यांनी केला. (BJP leader Narayan Rane slams CM Uddhav Thackeray)

संजय राऊत यांनी नुकतीच ‘सामना’ दैनिकासाठी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांना विरोधकांना अप्रत्यक्ष इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर ‘टीव्ही 9 मराठी’शी बातचीत करताना नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले. आम्हाला नका सांगू हात धुवून मागे लागू. कोण कोणाच्या मागे लागेल हे लवकरच कळेल. माझ्याकडे शंभर टक्के कुंडल्या आहेत. त्यामुळे मातोश्रीच्या आतल्या आणि बाहेरच्या अशा सर्वांची पळता भुई थोडी होईल. आम्ही मागे लागलो तर तुम्हाला झोप येऊ देणार नाही, असा इशारा नारायण राणे यांनी दिला.

यावेळी नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीकास्त्र सोडले. महाविकास आघआडीतील तिन्ही पक्ष केवळ सत्तेसाठी एकत्र आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस तर केवळ मंत्रिपदांसाठी शिवसेनेसोबत गेली, अशी टीका नारायण राणे यांनी केली.

महाविकासआघाडी सरकारचा एक वर्षाचा कारभार निष्क्रिय आणि महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणारा आहे. ज्ञान नसलेला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला म्हणून महाराष्ट्र पिछाडीकडे चालला आहे. याला जशी शिवसेना जबाबदार तेवढेच आघाडी सरकारच्या सत्तेत असणारे दोन्ही पक्ष जबाबदार आहेत, त्यांचीही तेवढीच नैतिक जबाबदारी असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले.

‘तुम्ही धुतले तांदूळ नाहीत, तुमचीही खिचडी शिजवू शकतो’

मी शांत आहे, संयमी आहे. पण याचा अर्थ मी काही नामर्द नाही आणि ज्या पद्धतीने आमच्या लोकांच्या कुटुंबीयांवर हल्ले सुरू झाले आहेत ही पद्धत निदान महाराष्ट्राची तरी नाही. नक्कीच नाही. कुटुंबीयांवर येणार असाल, मुलाबाळांवर येणार असाल तर आमच्या अंगावर येणाऱ्यांना ज्यांना ज्यांना कुटुंब आणि मुलंबाळं आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की, तुम्हालाही कुटुंब आणि मुलंबाळं आहेत. तुम्ही धुतले तांदूळ नाहीत. तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू शकतो, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना ठणकावले होते.

संबंधित बातम्या:

गंजलेल्या तोफेतून आलेल्या गोळ्यांना उत्तर द्यायचं नसतं; जयंत पाटलांची राणेंवर खोचक टीका

भाजपचे नेते तोंडाला येईल ते बोलतात, चंद्रकांत पाटील बावचळलेत; अजित पवारांचा हल्लाबोल

हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे?; मुख्यमंत्र्यांचा भाजपसह राज्यपालांवर पलटवार

(BJP leader Narayan Rane slams CM Uddhav Thackeray)