नाशिकचा पुढचा महापौर शिवसेनेचाच; संजय राऊतांचा दावा

| Updated on: Dec 12, 2020 | 2:24 PM

कुणी कितीही वल्गाना केल्या तरी नाशिकचा पुढचा महापौर आमचाच असेल. मुंबई महापालिकेवरही शिवसेनेचाच भगवा फडकेल, असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला. (nashik Mayor will be from ShivSena, Sanjay Raut says)

नाशिकचा पुढचा महापौर शिवसेनेचाच; संजय राऊतांचा दावा
Follow us on

नाशिक: सध्याचं राजकीय वातावरण बदललं आहे. त्यामुळे आम्हीही नाशिकपासून कामाला सुरुवात केली आहे, असं सांगतानाच कुणी कितीही वल्गाना केल्या तरी नाशिकचा पुढचा महापौर आमचाच असेल. मुंबई महापालिकेवरही शिवसेनेचाच भगवा फडकेल, असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला. (nashik Mayor will be from ShivSena, Sanjay Raut says)

संजय राऊत यांनी आज नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन हा विश्वास व्यक्त केला. नाशिकमधील बदलाविषयी आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढण्याचा आमचा विचार आहे. बाकी निवडणुका तुम्ही पाहिल्याच आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक झाली. पहिल्यांदाच आम्ही एकत्र आलो आणि इतरांचे बालेकिल्ले ढासळले, असा खोचक टोला लगावतानाच जनतेचा कौल महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. ठाकरे सरकारच्या बाजूने आहे. नाशिकमध्येही महाविकास आघाडीचा विचार केला तर शिवसेना पहिल्या नंबरवर आहे. मात्र सर्वांचा सन्मान राखूनच निवडणुका लढवल्या जाणार आहेत. कोणी कोणा बरोबर गेलं तरी मुंबई मनपा शिवसेनेकडेच राहील आणि नाशिकचा पुढचा महापौरही शिवसेनेचाच होईल, असं राऊत म्हणाले.

पवारांवर काँग्रेसने अन्याय केला

यावेळी राऊत यांनी माजी राष्ट्रपती आणि दिवंगत काँग्रेस नेते प्रणव मुखर्जी यांच्या पुस्तकावरही भाष्य केलं. प्रणव बाबू हे मोठे नेते होते. पंतप्रधान कोण असावा याचा निर्णय पक्षाने घ्यायचा असतो, असं राऊत म्हणाले. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर काँग्रेसने अन्याय केल्याचं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. पवारांवर काँग्रेसने अन्याय केलाय हे मी वारंवार सांगत आलो आहे. पवारांकडे देशाचं नेतृत्व करण्याची ताकद आहे. पण कमी कुवतीच्या लोकांना पवारांची नेहमी भीती वाटत राहिली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. पवारांनी कधीच पंतप्रधान व्हायला हवं होतं. पक्षाचा नेता जी दिशा देतो त्यावर पक्षाचं भवितव्य ठरत असतं, असंही ते म्हणाले.

त्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटणार

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीने समन्स पाठवलं आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. ईडी किंवा सीबीआयने गुलामाप्रमाणे वागू नये. या संस्था केंद्र सांगेल तसं वागतात. माझ्याकडे 100 लोकांची यादी आहे. त्यांना ईडीने समन्स पाठवायला हवं, असं सांगतानाच सरनाईक यांना नाहक त्रास दिला जात आहे. तुम्ही सर्व हत्यारे वापरा काहीच होणार नाही. आम्ही लढणार. त्यांचा भ्रमाचा भोपळा फुटणार, असंही ते म्हणाले. (nashik Mayor will be from ShivSena, Sanjay Raut says)

घटना मोदी-शहांनी लिहिली नाही

शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचं काम सुरू आहे. देशातील वातावरण हळूहळू खराब करण्यात येत आहे. या देशाची घटना डॉ. आंबेडकरांनी लिहिली आहे. मोदी किंवा अमित शहा यांनी लिहिली नाही. त्यामुळे कायदे हे जनहिताचेच असावेत, आमचीही तिच मागणी आहे, असं राऊत म्हणाले.

राऊत काय म्हणाले

>> कपड्यांवर देवाची भक्ती अवलंबून नसते

>> राज्यपालांना घटनेनुसार राज्यपाल नियुक्त सदस्यपदासाठी दिलेली नावं स्वीकारावा लागतील.

>> केंद्राने राज्याला मदत करावी. अनेक राज्य मदतीच्या प्रतिक्षेत.

>> ज्या राज्यात भाजप सरकार नाही, त्यांना मदत करायची नाही. हा देशापुढचा धोका आहे.

>> सरकार पाडण्याचा प्रयत्न होणार नाही. हे सरकार पडणार नाही. (nashik Mayor will be from ShivSena, Sanjay Raut says)

 

संबंधित बातम्या:

Beed | शरद पवार चालते बोलते विश्व विद्यापीठ : धनंजय मुंडे

“आमच्या टप्प्यात आला की आम्ही करेक्ट कार्यक्रम करतोच”, सांगलीत जयंत पाटलांच्या पोस्टरची जोरदार चर्चा

भाजपनं पराभवाचा राग ‘गव्या’वर काढला का? राऊतांनी पुन्हा डिवचलं

(nashik Mayor will be from ShivSena, Sanjay Raut says)