रिंगमास्टरच्या हंटरवर चालणारे मंत्री लोकशाही सरकारला ‘सर्कस’ म्हणतात : नवाब मलिक

| Updated on: Jun 09, 2020 | 10:59 AM

"महाराष्ट्र सरकार हे तीन पक्षांचे सरकार आहे. असं वाटतं की सरकारच्या नावाखाली 'सर्कस' होत आहे" अशी टीका राजनाथ सिंह यांनी केली होती (Nawab Malik answers Rajnath Singh)

रिंगमास्टरच्या हंटरवर चालणारे मंत्री लोकशाही सरकारला सर्कस म्हणतात : नवाब मलिक
Follow us on

मुंबई : रिंगमास्टरच्या हंटरवर चालणाऱ्या सरकारचे मंत्री लोकशाहीने चालणाऱ्या सरकारला ‘सर्कस’ म्हणतात, अशा शब्दात महाविकास आघाडीतील अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या टीकेला उत्तर दिले. महाराष्ट्रात सरकार नसून सर्कस सुरु असल्याची बोचरी टीका राजनाथ सिंह यांनी केली होती. (Nawab Malik answers Rajnath Singh Criticism comparing Maharashtra Government with Circus)

“महाराष्ट्रात लोकशाही पद्धतीने चालणारे सरकार चांगले काम करत आहे. कोविडबाबत मुंबई मॉडेलचे आयसीएमआरने (भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद) कौतुक केले आहे. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंहजी, रिंगमास्टरच्या हंटरवर चालणाऱ्या सरकारचे मंत्री लोकशाहीने चालणाऱ्या सरकारला ‘सर्कस’ असे संबोधतात. अनुभवाचे बोल” अशा आशयाचे ट्वीट नवाब मलिक यांनी केले आहे.

राजनाथ सिंह काय म्हणाले ? : सत्तेच्या लालसेतून शिवसेनेकडून धोका, महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार नव्हे, सर्कस : राजनाथ

राजनाथ सिंह यांनी सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्र जनसंवाद रॅलीला संबोधित केले होते. यावेळी राजनाथ सिंह यांनी सोनू सूदचेही कौतुक केले. ‘मी टीव्हीवर पाहिले की अभिनेता सोनू सूद या संकटात अडकलेल्या कामगारांना मदत करत आहे. पण संकटात अडकलेल्या मजुरांना मदत करणार्‍या व्यक्तीवर काही जण टीका करत आहेत.’ असा निशाणा राजनाथ सिंह यांनी साधला होता.

“महाराष्ट्र सरकार हे तीन पक्षांचे सरकार आहे. असं वाटतं की सरकारच्या नावाखाली ‘सर्कस’ होत आहे. महाराष्ट्र शासनाकडे ज्या प्रकारची दूरदृष्टी असायला हवी, तीच दिसत नाही” अशी टीकाही त्यांनी केली होती.

राजनाथ सिंह यांनी शिवसेनेला युती तोडल्याबद्दल कडाडून टोला लगावला “जेव्हा निवडणुका लढल्या गेल्या, तेव्हा भाजपशी शिवसेनेने युती केली. पण युतीनंतर सत्तेच्या लालसेतून भाजपला धोका दिला. मला विश्वास नाही बसत ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे” असा घणाघात राजनाथ सिंह यांनी केला होता.

“काँग्रेस नेते राहुल गांधी सांगतात की आम्ही महाराष्ट्रात सत्तेत आहोत, पण निर्णयात नाही. म्हणजे जेव्हा संकट येते, तेव्हा हे हात झटकतात” अशी टीका राजनाथ यांनी केली होती.

मुंबईतील रुग्णालयांच्या परिस्थितीचा उल्लेख करत राजनाथ सिंह म्हणाले, “काही रुग्णालयांमध्ये जिथे मृतदेह पडलेले आहेत, तिथेच कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार होत आहेत. तिथे सरकार नावाची गोष्ट शिल्लक राहिली नाही का? सरकार आपली जबाबदारी झटकू शकत नाही. कोविडशी लढण्यासाठी आम्ही महाराष्ट्र सरकारला सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहोत” असे आश्वासन राजनाथ यांनी दिले. (Nawab Malik answers Rajnath Singh Criticism comparing Maharashtra Government with Circus)