तीन पक्षांनी एकत्र यावं ही माझी 2014 पासूनची इच्छा, पण तेव्हा पवारांनी जनमताचा विचार केला : नवाब मलिक

| Updated on: Nov 29, 2020 | 3:47 PM

नवाब मलिक यांनी आज (29 नोव्हेंबर) 'टीव्ही 9 मराठी'ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली (Nawab Malik said I wanted three parties to come together since 2014).

तीन पक्षांनी एकत्र यावं ही माझी 2014 पासूनची इच्छा, पण तेव्हा पवारांनी जनमताचा विचार केला : नवाब मलिक
Follow us on

मुंबई : “तीन पक्षांनी एकत्र यावं, अशी माझी 2014 साला पासूनची इच्छा होती. मी याबाबत आधीच सांगितलं होतं. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तेव्हा भाजपला दिलेल्या जनमताचा विचार केला. त्यामुळे भाजपचं सरकार बनलं”, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला. त्यांनी आज (29 नोव्हेंबर) ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली (Nawab Malik said I wanted three parties to come together since 2014).

“भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पोपट झाले. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भविष्यवाणी करायला सुरुवात केली. देवेंद्र फडणवीस हे मामू, माजी मुख्यमंत्र्यांनाही काहीतरी बोलावच लागेल ना? पण भाजपला सत्तेशिवाय राहता येत नाही. सध्या भाजपची गोच्ची होतेय. जे भाजपमध्ये आहेत, ते सोडून जायला तयार आहेत”, असा घणाघात नवाब मलिक यांनी केला.

“शेतकऱ्यांची हमीभावाच्या कायद्यात अंतरभूत करण्याची मागणी आहे. शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या शब्दावर विश्वास का ठेवावा? काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बोलले शेतकऱ्यांना चर्चेला बोलावलं. पण चार महिने सरकार गप्प का बसले? भाजप शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्यांच्या मालाची लूट करणं योग्य नाही, मोदी सरकारचं काही खरं नाही”, अशी टीका मलिक यांनी केली.

“केंद्रीय यंत्रणांचा मोदी सरकार गैरवापर करत आहे. जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे. मागच्या निवडणुकांमध्ये उत्तर मिळालं. पण पुढच्या निवडणुकीतही मिळेल. राज्य सरकार कुणाला घाबरत नाही. जेवढी कारवाई होईल त्याला नेते आणि पक्ष कार्यकर्ते जोमाने उत्तर देतील. तितक्यात जोमानं काम करतील”, अशी भूमिका नवाब मलिक यांनी मांडली (Nawab Malik said I wanted three parties to come together since 2014).

हेही वाचा : …तेव्हा पोपट घेऊन चंद्रकांत पाटील चिठ्ठ्या काढत होते; नवाब मलिक यांचं टीकास्र