राष्ट्रवादीचे 22 आमदार पवारांच्या संपर्कात? अखेर मुंबईतील बैठकीत सत्य समोर; भुजबळ म्हणाले सर्व आमदार…
मुंबईतील देवगिरी या शासकीय बंगल्यावर राष्ट्रादीच्या आजी-माजी आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे आमदार, मंत्री, ज्येष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत आम्ही सर्व आमदार कोणाच्याही संपर्कात नाही, असे आमदारांनी सांगितले आहे. तशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

NCP Meeting And MLA : गेल्या काही दिवसांपासून सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात अनेक घडामोडी घडत आहेत. खासदार प्रफुल्ल पटेल तसेच खासदार सुनिल तटकरे हे नाराज असल्याचे बोलले जात आहे. माध्यमांमध्ये चर्चा झाल्यानंतर या दोन्ही नेत्यांनी नाराज नसल्याचं सांगितलेलं आहे. परंतु पक्षाची सर्व सूत्रं सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांनी आपल्या हाती घेतले आहेत. राष्ट्रवादी पक्षातील एकूण 20 ते 22 आमदार खासदार शरद पवार यांच्या संपर्कात आहेत, असा दावा केला जात होता. याच चर्चेचे उत्तर आता मिळाले आहे. मुंबईत देवगिरी या शासकीय बंगल्यावर राष्ट्रावादीच्या आजी-माजी आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे आमदार, मंत्री, ज्येष्ठ नेते उपस्थित होते. याच बैठकीत आम्ही सर्व आमदार कोणाच्याही संपर्कात नाही, असे आमदारांनी सांगितले आहे. तशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
बैठकीत नेमकं कोणत्या विषयावर चर्चा झाली
बैठक पार पडल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली आहे. यावेळी त्यांनी आमदारांतील नाराजी यावर भाष्य केलं आहे. या बैठकीला प्रफुल्ल पटेल मात्र गैरहजर होते. निवडणूक आयोगाच्या SIR प्रणाली संदर्भात बैठकीत चर्चा झाली. बीएलओ आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कसं काम करावं या संदर्भात चर्चा झाली. त्या संदर्भात काही तज्ज्ञ लोक आले होते. त्यांनी मार्गदर्शन केलं. 10 जूनला पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन होत आहे. त्याची जागा ठरवली जाईल. त्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमी संदर्भात बैठकीत चर्चा झाली, अशी माहिती भुजबळ यांनी दिली.
आमदारांमध्ये खरंच नाराजी आहे का?
गेल्या काही दिवसांपासून वीस ते बावीस आमदार पवार गटाच्या संपर्कात आहेत, अशा वावड्या पसरल्या होत्या. त्या संदर्भातसुद्धा बैठकीत चर्चा झाली. पण सर्व आमदारांनी छातीठोकपणे सांगितलं की आम्ही पक्षासोबतच आहोत. आम्ही कुणाच्या संपर्कात नाही, असे आमदारांनी सांगितले आहे, अशी माहिती भुजबळ यांनी दिली. नाराजी काही नाही, समोरुन लोक बोलतात म्हणून बातम्या होतात, असेही त्यांनी सांगितले.
राज्यात शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या कांदा प्रश्नावरही भुजबळ यांनी यावेळी सांगितले. कांद्याच्या प्रश्नावर उद्या महायुतीचे शिष्टमंडळ दिल्लीत अमित शाहा यांची भेट घेणार आहे. सरकारचा प्रयत्न आहे की कांदा उत्पादकांना न्याय मिळावा, असे मत भुजबळ यांनी व्यक्त केले.