गुलाल उधळत नाचायला आदित्य ठाकरेंचं लग्न ठरलंय का?; नितेश राणेंची खोचक टीका

या पुढे जर कुणी आमच्या महाराष्ट्रात पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावले तर ते काय परत घरी सुखरूप घरी जाणार नाहीत. गरज पडल्यास आम्ही रस्त्यावर उतरू. कारण आम्हाला आमचा देश आणि राज्य वाचवायचं आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

गुलाल उधळत नाचायला आदित्य ठाकरेंचं लग्न ठरलंय का?; नितेश राणेंची खोचक टीका
गुलाल उधळत नाचायला आदित्य ठाकरेंचं लग्न ठरलंय का?; नितेश राणेंची खोचक टीका
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 24, 2022 | 2:17 PM

समीर भिसे, मुंबई: शिवसेनेला (shivsena) दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळाल्यानंतर शिवसैनिकांनी शिवसेना भवन आणि मातोश्री निवासस्थानाबाहेर प्रचंड जल्लोष केला. यावेळी शिवसैनिकांनी गुलाल उधळत ढोलाच्या तालावर ठेका धरत आपला आनंद व्यक्त केला. शिवसैनिकांच्या या जल्लोषावर भाजप (bjp) आमदार नितेश राणे (nitesh rane) यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. गुलाल उधळत एवढं नाचायला आदित्य ठाकरेंचं लग्न ठरलं आहे का? भाजपला दहीहंडीच्यावेळी जांबोरी मैदान मिळालं. मग भाजपनेही असंच नाचायला हवं होतं का? असा सवाल करत नितेश राणेंनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

शिवाजी पार्क मैदान मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांना भांडायला लागते हे त्यांचं अपयश नाही का? एक साधं मैदान तर जिंकलं आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा आदरच करावा लागतो. त्यांना योग्य वाटलं तसा त्यांनी निर्णय दिला. पण आदित्यचं काय एखाद्या मुलीशी लग्न ठरलं आहे का? मग एवढं गुलाल उधळत नाचायची गरज काय? आम्ही दहीहंडीच्यावेळी जांबोरी मैदान मिळवलं. तेव्हा भाजपने नाचून दाखवायचं होतं का? साधं एक मैदान मिळालं तर एवढं नाचतायहेत. उद्या आदित्य ठाकरेंच्या लग्नावेळी तर हे सी-लिंकमध्ये उड्याच मारतील, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.

यावेळी त्यांनी शीतल म्हात्रे प्रकरणावर बोलण्यास नकार दिला. श्रीकांत शिे यांनी स्वत:ची भूमिका स्पष्ट केली आहे. म्हात्रेही त्यांची भूमिका स्वत: मांडतील, असं सांगत या मुद्द्यावर अधिक बोलणं त्यांनी टाळलं.

पीएफवाय ही एक दहशतवादी संघटना आहे. देशाच्या विरोधात ते सातत्याने कारवाई करत आहेत. मुस्लिम तरुणांचा वापर सुरू आहे. या तरुणांना हाताशी धरुन त्यांना आधार कार्ड बनवून दिलं जात आहे. धर्मांतरासाठी ही संघटना काम करते. हिंदू समाजाला नुकसान पोहोचवण्यासाठी ते काम करत आहेत, असं ते म्हणाले.

या तरुणांनी पुण्यात पाकिस्तानच्या समर्थनाचे नारे लावण्याची हिंमत दाखवली. याचा अर्थ ही पाळंमुळं किती खोल गेली आहे हे दिसून येतं. त्यांच्यावर कडक कारवाई व्हायलाच हवी. त्यांना अटक करून त्यांची हिंमत तोडण्याचं काम पोलिसांनी केलं पाहिजे. आज राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे. हिंदुत्वावादी गृहमंत्री आहेत. त्यामुळे पोलिसांनी कडक कारवाई करावी. भविष्यात त्यांच्या तोडून पाकिस्तानचं नाव ही येता कामा नये, असं त्यांनी सांगितलं.

या पुढे जर कुणी आमच्या महाराष्ट्रात पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावले तर ते काय परत घरी सुखरूप घरी जाणार नाहीत. गरज पडल्यास आम्ही रस्त्यावर उतरू. कारण आम्हाला आमचा देश आणि राज्य वाचवायचं आहे, असा इशाराही त्यांनी दिला.