‘बाकीचे भाषण करतात, गडकरी काम करतात’, बच्चू कडू यांच्याकडून कौतुक; गडकरींच्या पत्राबाबत कारवाईची मागणी

| Updated on: Aug 15, 2021 | 8:30 PM

शालेय शिक्षण राज्यमंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी बाकीचे भाषण करतात, नितीन गडकरी काम करतात, अशा शब्दात गडकरींचं कौतुक केलं आहे. तसंच गडकरींनी पत्रात उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील, असंही बच्चू कडू यांनी म्हटलंय.

बाकीचे भाषण करतात, गडकरी काम करतात, बच्चू कडू यांच्याकडून कौतुक; गडकरींच्या पत्राबाबत कारवाईची मागणी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यमंत्री बच्चू कडू
Follow us on

बुलडाणा : केंद्री रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरुन जोरदार राजकारण रंगलेलं पाहायला मिळत आहे. रस्ते कामात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून अडवणूक होत असल्याची तक्रारच एकप्रकारे नितीन गडकरींनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यात वाशिम जिल्ह्यातील रस्तांच्या कामांचा उल्लेख आहे. त्यावर बोलताना शालेय शिक्षण राज्यमंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी बाकीचे भाषण करतात, नितीन गडकरी काम करतात, अशा शब्दात गडकरींचं कौतुक केलं आहे. तसंच गडकरींनी पत्रात उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील, असंही बच्चू कडू यांनी म्हटलंय. (Bachchu Kadu Demand’s action on Gadkari’s letter to CM Uddhav Thackeray)

नितीन गडकरी आणि उद्धव ठाकरे हे दोघेही आमच्यासाठी आदरणीय आहेत. गडकरींनी पत्रात उपस्थित केलेले मुद्दे आधी तपासले जावेत. ते योग्य असतील तर मुख्यमंत्री निश्चितच त्यावर कारवाई करतील, असं बच्चू कडू म्हणाले. यात जबाबदार असलेला शिवसेनेचा नेता, कार्यकर्ता कितीही मोठा असला तरी मुख्यमंत्री कारवाई करतील, असा दावाही बच्चू कडू यांनी केला आहे. कडू यांनी आज शेगाव इथं शिवशंकर भाऊ यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

गडकरींच्या पत्राची मुख्यमंत्र्यांकडून तात्काळ दखल

नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामात स्थानिक लोकप्रतिनिधी अडथळे आणत असल्याचा गंभीर आरोप केला. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची तात्काळ दखल घेत थेट राज्याच्या पोलीस महासंचालकांना आदेश दिले आहेत. यात त्यांनी कत्राटदारांकडून लोकप्रतिनिधींविरुद्ध केलेल्या तक्रार अर्जाची आणि त्या अनुषंगाने दाखल गुन्ह्यांची माहिती मागितली आहे.

नितीन गडकरी यांच्या पत्रातील महत्वाचे मुद्दे

1. अकोला आणि नांदेड या 202 किमी राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये चौपदरीकरणाची कामे चार पॅकेजेसमध्ये सुरु आहेत. गेडशी ते वाशिम या पॅकेज-2 मध्ये वाशिम शहरासाठी बायपास (लांबी 12 किमी) निर्माण करण्याचे काम सुद्धा समाविष्ट आहे. परंतु, प्रस्तुत बायपास व मुख्य रस्त्याचे काम तेथील शिवसेना लोकप्रतिनिधींनी थांबवले असल्याचे मला सांगण्यात आले आहे.

2. या मतदारसंघात सुरु असलेल्या मालेगाव ते रिसोड या राष्ट्रीय महामार्गेच काम एक पूल वगळता पूर्णत्वास आलेले आहे. या लांबीमध्ये पैनगंगा नदीवर उंच पुलाचे काम अर्धवट स्वरुपात आहे. ते पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला मज्जाव केला जात आहे. काम सुरु केल्यास कार्यकर्ते येऊन धमक्या देतात. त्यामुळे कंत्राटदाराने आहे त्या स्थितीत काम अंतिम करण्याबाबत विनंती केली आहे.

3. पुलगाव-कारंजा-मालेगाव-मेहकर-सिंदखेडराजा हा राष्ट्रीय महामार्ग अतिशय खराब अवस्थेत आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम (अंदाजे किंमत 135 कोटी) आमच्या मंत्रालयाने हाती घेतले. परंतु वाशिम लोकसभा मतदारसंघातील लांबी वगळता इतर ठिकाणचे काम पूर्णत्वास आलेले आहे. वाशिम जिल्ह्यातील काम, विशेषतः सेलू बाजार गावातून जाणाऱ्या रस्त्याचे काम शिवसेना कार्यकर्त्यांनी थांबवले होते, अशी माहिती मला देण्यात आली. परिसरातील लोकांच्या मागणीनुसार आणि रस्ता धोकादायक स्थितीत असल्यामुळे कंत्राटदाराने पुन्हा काम सुरु केले असता शिवसेना कार्यकर्त्यांनी मशिनरीची जाळपोळ करुन कंत्राटदाराचे अधिकारी-कर्मचारी-कामगार यांच्यात दहशत निर्माण केली. त्यामुळे ते काम पुन्हा बंद झाले आहे.

4. उपरोक्त बाबी लक्षात घेता वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील कामे यापुढेही सुरु ठेवावीत की कसे? याबद्दल आमचे मंत्रालय आता गांभीर्याने विचार करत आहे. ही कामे आहे त्या स्थितीत अंतिम केल्यास ती वाहतुकीसाठी धोकादायक ठरतील. अपघाताचे प्रमाण वाढेल आणि त्यामुळे जनतेच्या असंतोषाला तोंड द्यावे लागेल.

5) हे असेच चालत राहिले तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गावरील कामे मंजूर करण्याच्या संदर्भात आमच्या मंत्रालयाला .विचार करावा लागेल. महाराष्ट्राचे आणि जनतेचे नुकसान होईल.

संबंधित बातम्या :

उद्धवजी, शिवसेनेच्या नियमबाह्य आणि दहशतीमुळे रस्त्याची कामं बंद पडतील, नितीन गडकरींचं स्फोटक पत्र

महाविकासआघाडी सरकारवर गडकरींचा लेटरबॉम्ब, राज्यातील ‘या’ प्रकल्पांच्या कामात स्थानिक नेते अडथळे आणत असल्याची तक्रार

Bachchu Kadu Demand’s action on Gadkari’s letter to CM Uddhav Thackeray