देवेंद्र फडणवीस-अजितदादांच्या पहाटेच्या शपथविधीला 1 वर्ष पूर्ण!, ते सरकार अल्पजीवी का ठरलं?

| Updated on: Nov 23, 2020 | 8:23 AM

विधानसभा निवडणुकीत भाजपला 105 जागा मिळाल्या होत्या. बहुमतासाठी 145 आमदारांची गरज होती. दुसरीकडे भाजपनं मुख्यमंत्रीपदाचा शब्द पाळला नाही म्हणत शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत संधान साधून होती. तर शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिलाच नाही, यावर भाजप नेते ठाम होते आणि आहेत. 

देवेंद्र फडणवीस-अजितदादांच्या पहाटेच्या शपथविधीला 1 वर्ष पूर्ण!, ते सरकार अल्पजीवी का ठरलं?
Follow us on

मुंबई: अवघा महाराष्ट्र साखरझोपेत असताना आजपासून बरोबर एक वर्षापूर्वी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. राजभवनात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. पण फडणवीस आणि अजितदादांची खेळी फार काळ टिकाव धरु शकली नाही आणि त्यांची ही सत्ता अल्पजीवी ठरली.(One year complete the swearing in ceremony of Devendra Fadnavis and Ajit Pawar)

फडणवीस-अजितदादांचं सरकार अल्पजिवी का ठरलं?

विधानसभा निवडणुकीत भाजपला 105 जागा मिळाल्या होत्या. बहुमतासाठी 145 आमदारांची गरज होती. दुसरीकडे भाजपनं मुख्यमंत्रीपदाचा शब्द पाळला नाही म्हणत शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत संधान साधून होती. तर शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिलाच नाही, यावर भाजप नेते ठाम होते आणि आहेत.  अशावेळी मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं नावाला शरद पवार यांनी पसंती दिल्याचं कळत होतं. पण अंतिम निर्णय बाकी होता. तर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपदासाठी जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु होती. त्याचबरोबर शेवटच्या अडीच वर्षासाठी सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्याबाबतही खल सुरु होता, असं बोललं जात होतं. त्यामुळे अजित पवार यांना आपलं राजकीय करिअर संपण्याची भीती वाटत होती. अशावेळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची मध्यरात्री BKCतील सोफिटेल हॉटेल मध्ये बैठक झाली आणि शपथविधी उरकण्याचा निर्णय झाला.

भाजपला बहुमतासाठी 40 आमदारांची गरज होती. भाजपचे 105, अन्य छोटे पक्ष आणि अपक्ष असे १५ आणि अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे 38 आमदार असा बहुमताचा आकडा पार करता येईल, अशी फडणवीसांना आशा होती. मात्र ती केवळ आशाच राहिली. कारण, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासह त्यांच्यासोबत गेलेल्या काही आमदारांचं बंड मोडून काढलं आणि पवार यांनी शिवसेना आणि काँग्रेससोबत नवी मोट बांधली. त्यामुळे 23 नोव्हेंबरला पहाटे झालेल्या शपथविधीनंतरचं फडणवीसांचं मुख्यमंत्रीपद अल्पजीवी ठरलं. त्यांना अवघ्या 80 तासांत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.

शपथविधीनंतर फडणवीस काय म्हणाले होते?

23 नोव्हेंबर २०१९ ला पहाटे शपथविधी पार पडल्यानंतर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी सर्वात प्रथम आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष अमित शाह यांचे आभार मानतो. महाराष्ट्राच्या जनतेने स्पष्ट जनादेश दिला होता, तरीही आमचा मित्रपक्ष शिवसेनेने युती तोडली. त्यामुळे अखेर आम्ही महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ नेत्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. त्यानंतर आम्ही राज्यपालांकडे दावा केला. राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे याबाबत माहिती देऊन आज आम्हाला शपथविधीसाठी बोलावलं. आम्ही स्थिर सरकार देऊ. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहू.”

पहाटेच्या शपथविधीवर अजितदादांचं म्हणणं काय?

तर “मागील अनेक दिवसांपासून सरकार स्थापन होत नव्हते. तसेच अनेक मागण्याही वाढत होत्या. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. शरद पवारांना याविषयी आधी माहिती दिली होती, पण नंतर मी त्यांना सांगत होतो की कोणी तरी दोघांनी किंवा तिघांनी एकत्र येऊन आल्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही. त्यामुळेच हा निर्णय घेतला,” असं अजित पवार म्हणाले होते.

संबंधित बातम्या:

आयुष्यात काही बदलायची संधी मिळाली, तर पहाटेचा शपथविधी बदलाल का? फडणवीस म्हणतात…

पहाटेच्या शपथविधीवर अमृता फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

One year complete the swearing in ceremony of Devendra Fadnavis and Ajit Pawar