दिग्गज नातेवाईकाच्या बॅनरवरुनच पवारांचा फोटो गायब

| Updated on: Jul 24, 2019 | 5:29 PM

पवारांचे नातेवाईक असलेल्या डॉ. पद्मसिंह पाटील पाटील कुटुंबाच्या बॅनरवर पवारांचाच फोटो नसल्याचं पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. शिवाय उस्मानाबादमध्येही लवकरच आऊटगोईंग सुरु होतं की काय अशीही चर्चा रंगली आहे.

दिग्गज नातेवाईकाच्या बॅनरवरुनच पवारांचा फोटो गायब
Follow us on

उस्मानाबाद : राजकारणाची हवा कोणत्या दिशेने वाहते हे अचूकपणे ओळखणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांच्याच पक्षाची हवा बदलल्याचं चित्र आहे. कारण, उस्मानाबादमध्ये निकटवर्तीय नेत्याच्या बॅनरवरुनच शरद पवारांचा ((Sharad pawar)) फोटो गायब झालाय. पवारांचे नातेवाईक असलेल्या डॉ. पद्मसिंह पाटील पाटील कुटुंबाच्या बॅनरवर पवारांचाच फोटो नसल्याचं पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. शिवाय उस्मानाबादमध्येही लवकरच आऊटगोईंग सुरु होतं की काय अशीही चर्चा रंगली आहे.

उस्मानाबाद आणि लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे 2017 च्या खरीप हंगामातील सोयाबीन पीक विम्याचे 56 कोटी मंजूर झाल्याचे होर्डिंग उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यात लावण्यात आले आहेत. मात्र या होर्डिंगवर केवळ माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील या पिता-पुत्रांचे फोटो झळकले आहेत. पवारांचा फोटो आणि पक्षाचं चिन्ह नसल्याने वाऱ्याची दिशा बदलली का अशी चर्चा मतदारसंघात रंगली आहे.

शरद पवार आणि पद्मसिंह पाटील हे एकमेकांचे नातलग आणि निकटवर्तीय सहकारी असल्याचं सर्वश्रुत आहे. एरवी उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादीचा एखाद्या गल्लीबोळात कार्यक्रम असला तरी होर्डिंगवर पक्षाच्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेतृत्वाच्या फोटोला मानाचं स्थान असतं. मात्र यावेळी पीक विम्याच्या लढाईचं श्रेय लाटण्यासाठी लावण्यात आलेल्या होर्डिंगवर शरद पवारांसह पक्षाच्या चिन्हालाही स्थान देण्यात आलं नाही.

विशेष म्हणजे हे होर्डिंग पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकारी यांनी शहरातील मुख्य चौकात लावले असून त्यातील मजकूर व मांडणी एकच आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करीत असताना राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींचा पडलेला विसर हा सामान्यांना न पटणारा आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात पद्मसिंह पाटील आणि परिवार हेच एकमेव हुकमी एक्का असल्याचा संदेश या होर्डिंगमधून देण्याचा हा प्रयत्न असावा, की आणखी काही सूचक राजकीय इशारा, याची चर्चा रंगली आहे.

नुकतेच भाजपच्या नेत्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मातब्बर घराण्यातील तरुण पिढी त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी योग्य वेळी भाजपचे कमळ हातात घेतील, असं भाकीत तुळजापूर येथे केलं होतं. त्या अनुषंगाने अनेक तर्कवितर्क लावले जात असतानाच उस्मानाबाद शहरातील बॅनरबाजीमुळे त्यात भर पडली आहे.

भाजपच्या नेत्यांनी जिल्ह्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीतील दादा, अण्णा आणि भाऊ अशी मंडळी लवकरच पक्षात दिसतील, असं म्हटलं होतं. त्यामुळे ही मंडळी कोण आहेत याबाबत राजकीय पैजा लागल्या आहेत.