
प्रवीण चव्हाण, मुंबईः पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका (Grampanchayat Election) दोन दिवसांवर येऊन ठेपल्या असताना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. पालघर जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती सुशील चुरी (Sushil Churi) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंसाठी (Uddhav Thackeray) ही मोठी गोष्ट यासाठी आहे की, सुशील चुरी हे संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनिल राऊत यांचे निकटवर्तीय होते. आज सुशील चुरी यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
सुशील चुरी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांना आपलं समर्थन असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे ग्रामपंचायतीचा विचार करता, ठाकरे गटात सध्या बोटावर मोजण्या इतके कार्यकर्ते आणि पदाधिकारी जिल्ह्यात राहिले आहेत. तर सुशील चुरी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने पश्चिम किनारपट्टीसह डहाणूच्या सर्व भागावर एकनाथ शिंदेंची पकड मजबूत झाल्याचं म्हटलं जातंय.
पालघर जिल्ह्यातील 342 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांसाठी तसेच स्थानिक पातळीवरील नेते, कार्यकर्त्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची समजली जातेय.
16 ऑक्टोबर रोजी या निवडणुकांसाठी मतदान होत आहे. 342 पैकी 10 ग्रामपंचायतींचे सरपंच आणि इतर ठिकाणचे 711ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे 16 ऑक्टोबर रोजी 332 सरपंच आणि 2780सदस्यांसाठी मतदान होणार आहे.