हिंदुत्वावर संकट ओढावलेले असताना मुख्यमंत्री स्वस्थ कसे बसू शकतात? ‘लव्ह जिहाद’ विरोधात कायदा करा : प्रसाद लाड

| Updated on: Nov 21, 2020 | 7:07 PM

राज्य सरकारने लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा करावा, अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली आहे (Prasad Lad demand to make act on love jihad).

हिंदुत्वावर संकट ओढावलेले असताना मुख्यमंत्री स्वस्थ कसे बसू शकतात? लव्ह जिहाद विरोधात कायदा करा : प्रसाद लाड
Follow us on

मुंबई : “शिवसेनेचं हिंदुत्व आजही अबाधित आहे, अशी आशा आहे. पण आज आपल्या हिंदुत्वावर संकट ओढावलेले दिसत असताना आपण स्वस्थ कसे बसू शकता?”, असा सवाल भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केला आहे. राज्य सरकारने लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा करावा, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. प्रसाद लाड यांनी याबाबत पाठवलेल्या पत्राचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत (Prasad Lad demand to make act on love jihad).

“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि माँ साहेबांचे पुत्र मुख्यमंत्री असलेल्या या महाराष्ट्रात आज सातत्याने महिलांवरील अत्याचार, बलात्कारासारख्या घटना समोर येत आहे, जे लाजिरवाणे आहे. या मुद्द्यावरुन राजकीय वाद पेटलेला असतानाही आपणांकडून काही ठोस पावलं उचलली जाऊ नये हे दुर्दैवी”, असं प्रसाद लाड मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हणाले आहेत.

“आजच्या घडीला देशात लव्ह जिहादच्या घटना वाढत असताना, अनेक राज्यांनी याप्रकरणी कठोर धर्म स्वातंत्र्य कायदा लागू केला आहे. मध्यप्रदेश सरकारने देखील अशा आंतरधर्मीय विवाहसंबंधी कायदा लागू करण्याचे घोषित केले आहे. या नवीन कायद्याअंतर्गत दोषींना 5 वर्षांपर्यंत शिक्षा ठोठावण्यात येईल. याआधीच उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाब सरकारने देखील अशाप्रकारचा कायदा आणणार असल्याची घोषणा केली होती”, असं प्रसाद लाड पत्रात म्हणाले.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माझी विनंती आहे की, आपणही आपल्या महाराष्ट्रात अशा प्रकारचा कठोर कायदा लागू करावा आणि लव्ह जिहाद सारख्या या धर्मसंकटातून आपल्या महाराष्ट्रातील लेकी-बाळींचं, माता-भगिनींचं रक्षण करावं”, अशी विनंती प्रसाद लाड यांनी केली (Prasad Lad demand to make act on love jihad).

“काही षडयंत्रकारी लोकांकडून स्वत:ची खरी ओळख लपवून, आपल्या लेकी-बाळींची फसवणूक करुन लव्ह जिहाद करण्याचा प्रयत्न केला जातोय. मुस्लिम तरुण कथितरित्या प्रेमाचा बनाव करुन केवळ धर्मांतरणासाठी, हिंदूधर्मीय तरुणींना फूस लावून त्यांच्याशी विवाह करत आहेत. तसेच मुलींचा शारीरीक, मानसिक आणि लैंगिक छळही करत आहेत. गेल्या काही वर्षांपासून या मुद्द्यावरुन राजकीय चर्चा सुरु आहेत. पण अद्याप या मुद्द्यावर सरकारकडून काही ठोस पावलं उचलण्यात आली नाहीत”, असं प्रसाद लाड पत्रात म्हणाले.

“माता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांसारख्या शूरवीरांचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात, साक्षात माँ साहेबांचा पुत्र मुख्यमंत्री असलेल्या महाराष्ट्रात आज सातत्याने महिलांवरील अत्याचाराच्या, बलात्काराच्या घटना समोर येत आहेत. या प्रकरणाच्या माध्यमातून मी आपणांस विनंती करतो, कृपया आपण लव्ह जिहाद सारख्या गंभीर विषयाकडे स्वत: लक्ष देऊन, राज्यात अशा दोषींना कठोर शासन करण्यासाठी कायदा लागू करावा”, अशी मागणी प्रसाद लाड यांनी पत्राद्वारे केली.

“लव्ह जिहादचा कायदा महाराष्ट्रात लागू करण्याबाबत आपण तत्काळ आपली भूमिका स्पष्ट करावी. आपल्या हिंदू माता-भगिनींवर येणारे धर्म संकटाचे सावट दूर करावे”, असंदेखील प्रसाद लाड पत्रात म्हणाले.

संबंधित बातम्या :

‘लव्ह जिहाद’ हा भाजपचा अजेंडा, मुलगा-मुलीची पसंती महत्त्वाची: किशोरी पेडणेकर

उत्तर प्रदेश सरकार लव्ह जिहादविरोधात कायदा करण्याच्या तयारीत, देश तोडण्याचा डाव, काँग्रेसचा निशाणा

‘लव्ह-जिहाद’ रोखण्यासाठी उत्तर प्रदेशात कडक कायदा; योगी आदित्यनाथ यांची घोषणा

प्रत्येक गोष्टीची जबाबदारी लोकांवर ढकलता, मग ठाकरे सरकार गोट्या खेळायला बसलंय का?: निलेश राणे