आपआपसात मारामाऱ्या करा, पण लोकांचा फायदा करा : देवेंद्र फडणवीस

| Updated on: Jul 17, 2020 | 4:15 PM

राजधानी दिल्लीत फडणवीसांना महाजॉब्स पोर्टलवरुन महाविकास आघाडीत सुरु असलेल्या वादाबाबत विचारण्यात आलं. (Devendra Fadnavis comment on Mahajobs portal)

आपआपसात मारामाऱ्या करा, पण लोकांचा फायदा करा : देवेंद्र फडणवीस
Follow us on

नवी दिल्ली : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज गृहमंत्री आणि मंत्रीगटाचे प्रमुख अमित शाह यांची भेट घेतली. ऊस आणि साखर उद्योगाच्या मदतीसाठी ही भेट असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. या भेटीनंतर दिल्लीत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना महाजॉब्स पोर्टलवरुन महाविकास आघाडीत सुरु असलेल्या वादाबाबत विचारण्यात आलं. (Devendra Fadnavis comment on Mahajobs portal)

त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आमचं म्हणण एव्हढंच आहे, फोटो कुणाचेही छापा, पण तुम्ही ज्या मोठ्या मोठ्या घोषणा केल्या आहेत, इतक्या कंपन्या येतील, इतके रोजगार मिळतील, या संदर्भात काही तरी कारवाई करा. बाकी तुम्हाला ज्यांचे फोटो छापायचे आहेत, ज्यांचे चेहरे दाखवायचे आहेत, त्यांचे दाखवा, आपआपसात मारामाऱ्या करा, फक्त लोकांना फायदा झाला पाहिजे याकडे लक्ष द्या”  (Devendra Fadnavis comment on Mahajobs portal)

Satyajeet Tambe | ‘ती’ योजना आघाडी सरकारची की शिवसेना-राष्ट्रवादीची?, सत्यजीत तांबेंचा थेट सवाल 

सरकार पाडण्यासाठी आमचे प्रयत्न नाहीत आणि रसही नाही, अंतर्विरोधाचं हे सरकार चालेल तोपर्यंत चालेल, पडेल तेव्हा बघू काय करायचं, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

माझी नियुक्ती नाही 

भाजपची नवी कार्यकारिणी अद्याप तयार झालेली नाही, त्यानंतर संसदीय समिती होईल, त्यामध्ये नियुक्त करण्याचा अधिकार पंतप्रधान, पक्षप्रमुखांचा आहे, माझी अद्याप नियुक्ती झालेली नाही, असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

शरद पवार काय करताहेत म्हणून आम्ही करायचं वगैरे अशी स्पर्धा नाही, केंद्रात आमचं सरकार आहे, त्यामुळे ज्या आवश्यक मागण्या आहेत त्या घेऊन आलो आहोत.

देशात काय चालतं, किंवा अन्य राज्यात काय चालतं हे मला माहिती नाही, मी महाराष्ट्रातील नेता आहे, असं म्हणत फडणवीस यांनी राजस्थानातील मिशन लोटसवर भाष्य केलं.

राजकीय भेट नाही

अमित शाहांसोबत झालेली भेट ही कुठलीही राजकीय भेट नाही, आम्हाला सरकार पाडणे वगैरेमध्ये रस नाही, शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे, यासाठी ही भेट झाली. पंतप्रधान मोदींची वेळ मिळाली तर त्यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील कोरोना स्थितीची माहिती देईन, काय करता येऊ शकतं याची माहिती देईन. अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत, त्यांचे महाराष्ट्रातील कोरोनास्थितीवर लक्ष आहे, असं फडणवीस यांनी सांगतिलं.

“यंदा महाराष्ट्रात ऊसाचं पीक वाढलं, शेतकऱ्यांना FRP आणि साखर कारखान्यांना मदत मिळायला हवी, या मागणीसाठी दिल्लीत आलो, अमित शाह यांची भेट घेतली, सकारात्मक चर्चा झाली. ऊस आणि साखर कारखान्यांबाबत कृषी मंत्र्यांचीही भेट घेणार आहोत, केंद्र सरकारकडून साखर उद्योगासाठी योग्य मदत होईल. कर्जाचं पुनर्गठण, साखर कारखान्यांना मदत, सॉफ्ट लोन, साखर भाव पडणार नाही यासाठी सकारात्मक चर्चा झाली, किमान विक्री दर वाढवण्याची मागणी केली आहे”, असं फडणवीस म्हणाले.

संबंधित बातम्या  

Mahajobs | शिवसेनेकडून दिलगिरी व्यक्त, महाजॉब्स जाहिरात वादावर बाळासाहेब थोरातांची रोखठोक भूमिका 

Satyajeet Tambe | ‘ती’ योजना आघाडी सरकारची की शिवसेना-राष्ट्रवादीची?, सत्यजीत तांबेंचा थेट सवाल