काँग्रेसचं अस्तित्व संपलं, लाचारी पत्करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडावं, राधाकृष्ण विखे पाटलांचा घणाघात

| Updated on: Feb 13, 2021 | 3:32 PM

राज्यातील सत्तेतही त्यांचे अस्तीत्व नाही. काँग्रेसने आता इशारा देणं सोडून द्यावं, असा सल्ला राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसला दिला. (Radha krishna vikhe patil Maha Vikas Aghadi)

काँग्रेसचं अस्तित्व संपलं, लाचारी पत्करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडावं, राधाकृष्ण विखे पाटलांचा घणाघात
Follow us on

अहमदनगर : “राज्यात काँग्रेसचं अस्तीत्वच राहीलं नाही. राज्यातील सत्तेतही त्यांचे अस्तीत्व नाही. काँग्रेसने आता इशारा देणं सोडून द्यावं. लाचारी पत्करून सत्तेत राहण्यापेक्षा काँग्रेसने सत्तेबाहेर पडावे” असा खोचक सल्ला भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसली दिला. ते शिर्डीमध्ये ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. यावेळे त्यांनी महाविकास आघाडी सरकारला चांगलंच फैलावर घेतलं.
“राज्यात काँग्रेसचं अस्तीत्व नाही. सत्तेत असूनही त्यांचं अस्तीत्व नाही. त्यांनी लाचारी पत्करुन सत्तेत राहण्यापेक्षा सत्तेबाहेर पडावं. त्यांचे राज्यात अस्तीत्त्वच नसल्यामुळे त्यांनी दुसऱ्यांना इशारा देण्याचं सोडून द्यांव,” असे विखे पाटील म्हणाले. (Radha krishna vikhe patil criticizes Maha Vikas Aghadi and congress)

वीजतोडणी थांबवावी अन्यथा मोठी किंमत चुकवावी लागेल

ज्या ग्राहकांनी विजेचे बील भरलेले नाही, अशा ग्राहकांची वीजजोडणी तोडण्याचा निर्णय महावितरणने घेतलेला आहे. अनेक जिल्ह्यात वीजतोडणीचे कामसुद्धा सुरु झालेले आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारवर सर्व स्तरांतून टीका होत आहे. यावर बोलताना विखे पाटील यांनी सरकारवर टीकेचे आसूड ओढले. “हे सरकार विजतोडणीचे महान कार्य करतंय. अगोदरच राज्यातील जनता आणी शेतकरी अडचणीत आहेत. त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे. राज्य सरकारने मोफत वीज देण्याची घोषणा केवळ लोकप्रियता मिळवण्यासाठी केली. आज धाकदडपशाहीने, दहशतीने नागरिकांकडून वीजबिलाची वसुली केली जात आहे. हे सरकार आपल्या घोषणा विसरलंय,” अशी टीका विखे पाटील यांनी केली. तसेच विजतोडणी त्वरित थांबवली नाही तर सरकारला भविष्यात मोठी किंमत चुकवावी लागेल, असा सूचक इशाराही त्यांनी सरकारला दिला.

दरम्यान, पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमध्ये वनमंत्री असलेले संजय राठोड यांचे नाव आल्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच सत्तेत राहण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किती तडजोडी करणार आहेत. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राज्याची लक्तरे वेशीला टांगली जात आहेत, अशी घणाघाती टीका विखे पाटील यांनी केली.

इतर बातम्या :

पूजा चव्हाणचा मृत्यू नेमका कशाने झाला? वाचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट

विखे-पाटील म्हणतात, राठोडांचा राजीनामा घ्या; आदित्य ठाकरे म्हणतात, माहिती घेऊन बोलतो

(Radha krishna vikhe patil criticizes Maha Vikas Aghadi and congress)