अदिती तटकरेंवर भाजप आमदारही नाराज, सोमय्यांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे नाराजी, रायगडमध्ये सेना-भाजप एकजूट?

| Updated on: Jun 23, 2020 | 7:54 AM

भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी अलिबाग बाबतीत पालकमंत्र्यांची मनमानी होत असून अलिबागच्या आमदारांनीही जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याचा दावा केला (Raigad BJP MLAs complaint against Guardian Minister Aditi Tatkare may unite with Shivsena)

अदिती तटकरेंवर भाजप आमदारही नाराज, सोमय्यांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे नाराजी, रायगडमध्ये सेना-भाजप एकजूट?
Follow us on

रायगड : रायगड जिल्ह्यात एकीकडे ‘निसर्ग’ चक्रीवादळाने थैमान घालून सामान्य जनतेला मेटाकुटीला आणले आहे. त्यातच जिल्हाभरात शासकीय मदतकार्य, बैठका या बाबतीत पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून भाजपाच्या तीन आमदारांनी ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. याचवेळी शिवसेना आमदार महेंद्र दळवीही जिल्हाधिकारी कार्यालयात दिसल्याने रायगडमध्ये तटकरेंविरोधात सेना-भाजपची एकजूट झाल्याची चर्चा रंगली. (Raigad BJP MLAs complaint against Guardian Minister Aditi Tatkare may unite with Shivsena)

अदिती तटकरे यांचा मनमानी कारभार सातत्याने घडत राहिल्यास यापुढे आक्रमक भूमिका घ्यायला लागेल, हे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.

शिवसेना आमदार महेंद्र दळवीही याच वेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला आले होते. परंतु भाजपच्या शिष्टमंडळाच्या आधी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पडणाऱ्या दळवी यांनी ‘मी माझ्या वैयक्तिक कामासाठी आलो होतो. भाजपच्या शिष्टमंडळाशी माझा काही सबंध नाही’ असे स्पष्ट केले. त्यानंतर भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी अलिबाग बाबतीत पालकमंत्र्यांची मनमानी होत असून अलिबागच्या आमदारांनीही जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याचा दावा केला.

हेही वाचा : अदिती तटकरेंच्या राजीनाम्यासाठी शिवसेना आक्रमक, रायगडमध्ये महाविकास आघाडीत कुरबूर

कोविड दरम्यान रेशन धान्यवाटप, चक्रीवादळाबाबत शासकीय मदत, धनादेश वाटप किंवा शासकीय बैठका असो, पेणचे आमदार रवीशेठ पाटील यांना डावलून पालकमंत्री थेट पेण मतदार संघात येऊन काम करतात, याबाबत अनेक वेळा रविशेठ पाटील यांनी तक्रार केली होती. परंतु सातत्याने हे घडत असल्याने उरणचे आमदार महेश बालदी, पेणचे आमदार रवीशेठ पाटील आणि काही सहकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली. कुठलेही निवेदन दिले नाही, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. अलिबाग बाबतीतही असे घडत असल्याचा उल्लेख त्यांनी केला. त्यामुळे अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी आणि भाजपचे आमदार हे राज्यात नाही, मात्र रायगड पालकमंत्र्यांच्या विरोधात एकत्र आल्याचे चित्र दिसून आले.

याआधी शिवसेनेचे दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांनीही 21 जूनला चक्रीवादळातील मदत कार्यात पालकमंत्री रायगडच्या जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप करुन पालकमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यातच जिल्ह्यातील भाजपच्या तीन आमदारांनी एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे पालकमत्र्यांच्या विरोधात तक्रार केल्यामुळे पालकमंत्री अदिती तटकरे यांच्यावर महाविकास आघाडीच्या सरकारमधील सहकारी पक्ष शिवसेना आणि विरोधी पक्ष भाजपच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ येणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.