IND vs ZIM: म्हणे मी उपकर्णधार…खराब फॉर्मबद्दल प्रश्न विचारताच तिलक वर्मा भडकला, उत्तर देताना माज दाखवला
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी-20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेपूर्वी पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत भारतीय संघाचा उपकर्णधार तिलक वर्माने उपस्थिती लावली.

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी-20 मालिका रंगणार आहे. उद्यापासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. भारतीय संघाची मागील कामगिरी पाहिली तर अतिशय वाईट दिसली. आता भारतीय संघ झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेतून कमबॅक करण्यासाठी सज्ज असेल. कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात भारती संघाला एकही सामना जिंकता आलेला नाही. आता या मालिकेपूर्वी पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत भारतीय टी-20 उपकर्णधार तिलक वर्मा उपस्थित राहिला. यात त्याने अनेक प्रश्नाची उत्तर दिली.
भारताचा टी-20 उपकर्णधार तिलक वर्मा मंगळवारी म्हणाला की, “इंग्लंड आणि आयर्लंडमध्ये सुरुवातीलाच विकेट पडल्यामुळे माझ्यासारख्या मधल्या फळीतील फलंदाजांना पूर्ण ताकदीने खेळता आले नाही. माझा खेळ हा खेळाची परिस्थिती आणि सामन्याच्या स्थितीवर अवलंबून असतो. या फॉरमॅटमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या स्थानांवर फलंदाजी करावी लागते आणि ते सोपे नसते, विशेषतः अशा परिस्थितीत. मी नेहमी म्हणतो की संघासाठी जे काही आवश्यक असेल ते मी करेन. जर मला संघाची वाट पाहत धावा करायच्या असतील, तर मी त्यानुसार खेळेन. जर मला फटका मारायचा असेल, तर मी फटका मारतो आणि खेळतो. त्यावेळची संघाची परिस्थिती पाहता, आयर्लंडपासून इंग्लंडपर्यंत, पॉवर प्लेमध्ये नेहमी चार-पाच विकेट पडत होत्या. त्यामुळे तिथे जाऊन फलंदाजी करणे आणि बाद होणे शहाणपणाचे नव्हते.”
तिलक म्हणाला, “मी क्रीजवर येऊन पहिल्याच चेंडूवर फटका मारू शकतो, हे माझ्या मनात नेहमीच असते. पण त्याच वेळी, मी देशासाठी खेळत आहे, त्यामुळे माझ्यावर बरीच जबाबदारी आहे. जेव्हा उपकर्णधारपद तुमच्या नावाशी जोडले जाते, तेव्हा संघाने ते मला विचारपूर्वकच दिले असेल. त्यामुळे, व्यवस्थापन मला ज्या जबाबदाऱ्या देते, त्या मला स्वीकारायच्या आहेत. मी त्यानुसारच खेळत आहे.”
“इंग्लंड आणि आयर्लंडमधील पराभवांबद्दल बोलताना तिलक म्हणाला की, “गेल्या काही वर्षांपासून आशियामध्ये सर्वाधिक क्रिकेट खेळल्यानंतर संघाला तिथल्या परिस्थितीशी जुळवून घेता न आल्याने ही खराब कामगिरी झाली. खरं सांगायचं तर, श्रेयस सध्या एका यशस्वी संघाचे नेतृत्व करत आहे. साहजिकच, जबाबदाऱ्या आणि अपेक्षा असतील. आयर्लंडमधील परिस्थिती वेगळी होती. गेल्या दोन वर्षांचा विचार केल्यास, आम्ही आशियामध्ये जास्त सामने खेळलो आहोत,” असे ते म्हणाले.
