“मी राज श्रीकांत ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…. हे वाक्य कानावर पडेल तो सुवर्ण दिवस असेल”

| Updated on: Jun 20, 2021 | 8:34 PM

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आज एक खास ट्वीट केलंय. त्यांचं हे ट्वीट आता चर्चेला विषय ठरलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एक खास आणि नेहमीच्या राजकीय पठडीपेक्षा वेगळा फोटो शेअर केलाय.

“मी राज श्रीकांत ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की.... हे वाक्य कानावर पडेल तो सुवर्ण दिवस असेल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे
Follow us on

मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या आणि विरोधी पक्ष भाजपच्या कारभारावर सातत्याने हल्ले चढवणारे मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आज एक खास ट्वीट केलंय. त्यांचं हे ट्वीट आता चर्चेला विषय ठरलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एक खास आणि नेहमीच्या राजकीय पठडीपेक्षा वेगळा फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये राज ठाकरे चक्क टी-शर्ट, जॅकेट आणि जीन्समध्ये पाहायला मिळतात. फक्त फोटोच नाही तर अमेय खोपकर यांनी केलेलं ट्वीटही तितकंच खास आहे. राज्यात सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर खोपकर यांनी हे ट्वीट केलं आहे. (Ameya Khopkar’s tweet, due to a special photo of Raj Thackeray)

‘माझ्या महाराष्ट्रात राजकारण्यांचे सत्तेसाठी सुरु असलेले किळसवाणे ‘प्रताप’ बघितले की पुन्हा एकदा खात्री पटते… “मी राज श्रीकांत ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की….”हे वाक्य कानावर पडेल, तो दिवस महाराष्ट्राच्या भवितव्यातील सर्वात सुवर्ण दिवस असेल’, असं ट्वीट अमेय खोपकर यांनी केलंय. राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यास तो दिवस महाराष्ट्राच्या भवितव्यातील सर्वात सुवर्ण दिवस असेल, असं खोपकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय.

प्रताप सरनाईकांचं मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेनेला कमकुवत करत असल्याचा दावा सरनाईक यांनी केलाय. इतकंच नाही तर भाजपसोबत जुळवून घेण्याचा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलाय. सत्तेत असलेले राष्ट्रवादी-काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत आहेत. आपला पक्ष कमकुवत होत असेल तर मोदींशी जुळवून घेतलेले बरे. त्यामुळे सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या सहकाऱ्यांना होत असेलला नाहक त्रास तरी थांबेल, असा दावाही सरनाईक यांनी आपल्या पत्रात केला आहे.

शरद पवार दिल्ली दौऱ्यावर

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात नुकतीच एक बैठक पार पडली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी शरद पवार यांनी शिवसेनेचं तोंडभरुन कौतुक करताना, शिवसेना विश्वासू पक्ष असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता शरद पवार थेट दिल्लीवारीला गेल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या दौऱ्यात शरद पवार पंतप्रधान मोदींची भेट घेणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. राज्यातील या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अमेय खोपकर यांनी केलेलं ट्वीट चर्चेचा विषय ठरत आहे.

संबंधित बातम्या :

शिवसेना-राष्ट्रवादीत वितुष्ट निर्माण होणार नाही, प्रताप सरनाईकांच्या पत्रानंतरही जयंत पाटलांना विश्वास

प्रताप सरनाईकांनी लेटर लिहून ‘लहान तोंडी मोठा घास’ घेतला आहे का?; वाचा 5 मोठे मुद्दे

Ameya Khopkar’s tweet, due to a special photo of Raj Thackeray