Raj Thackeray: सत्ताधाऱ्यांमध्ये सत्तेचा माज वाढलाय, CMच्या मौनाचं कारण काय?; राज ठाकरे साटम प्रकरणावर संतापले
Raj Thackeray: आमदार तथा मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये विरोधी बाकावरचे नेते आमदार जयंत पाटील यांच्याशी संवाद साधताना साहेब काल झाडावर होतं, आज मॅनहोल झालं, असं बोलताना अमित साटम हसत आहेत.अमित साटम या व्हिडीओत चक्क हसत असताना दिसत आहेत. यावर राज ठाकरे यांनी निशाणा साधला आहे.

सध्या राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे तर काही ठिकाणी झाडे कोसळून दुर्घटना घडली. पहिल्या दुर्घटनेत एका चिमुकल्याचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत असलम शेख या व्यक्तीचा मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवी अंत झाला आहे. या दोन्ही घटनांमुळे संताप व्यक्त केला जात आहे. चेंबूर आणि साकीनाका येथे घडलेल्या दोन संवेदनशील घटनेबाबत बोलताना आमदार अमित साटम यांना हसू आले होते. आता यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.
काय आहे राज ठाकरेंची पोस्ट?
राज ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी, भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आला आहे, हे पूर्व , पश्चिम , उत्तर , दक्षिण भारतातील लोकं सर्रास बोलत आहेत. केंद्रातील लोकं वाट्टेल तसे वागत आहेत याचा राग लोकांच्या मनात होता आणि आहेच. पण हा संसर्ग आता आपल्या राज्यापर्यंत पसरला आहे ? आणि तुम्ही तू पसरू देताय? असा सवाल केला आहे.
पुढे ते म्हणाले, “देशातील इतर राज्यातील राजकारण आणि महाराष्ट्रातील राजकारण यात जमीन असमानाचा फरक होता. महाराष्ट्रच्या राजकीय नेत्यांच्या विचारांचं आणि उमदेपणाचं एक कौतुक आणि कुतूहल साऱ्या देशात होतं ! पण गेल्या काही वर्षांत आपण आपली बरोबरी उत्तरेकडील काही मागास विचारांच्या राज्यांबरोबर करायला लागलोय हे आता स्पष्टपणे जाणवत आहे! तुमचा एक आमदार आणि पदाधिकरी लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतो आणि त्यावर कारवाईचा एकही आसूड ओढला जात नाहीये. एक फार प्रसिद्ध वाक्य आहे जे तुम्ही पण कधी ऐकलं असेल, ‘Power tends to corrupt, and absolute power corrupts absolutely’ पण या वाक्याचा अर्थ उद्या समजून सांगायची वेळ आली तर सध्याचे भारतीय जनता पक्षाचे तुमचे सहकारी हे आदर्श उदाहरण ठरतील अशी परिस्थिती आहे. कोणाला कशाचाच खेद नाही, खंत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि या सगळ्यात तुम्ही एकही अवाक्षर बोलत नाही यामुळे सगळे बेफाम झाले आहेत.”
थेट मुख्यमंत्र्यांना सवाल
“देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत, संवेदनशील आहेत असं महाराष्ट्राला वाटत होतं, आणि मलाही वाटत होतं. पण हे असले प्रकार जेंव्हा होतात आणि त्यावर जेंव्हा काहीही खेद तुमच्या कडून व्यक्त केला जात नाही, तेंव्हा मात्र तुमच्या संवेनशीलतेबद्दलच शंका घ्यावी लागते. मी गेली ३७ वर्ष राजकारणात सक्रिय आहे. या काळात महाराष्ट्रात एखाद्या नेत्याकडून प्रमाद घडला, चूक झाली तर तो स्वपक्षाचा आहे म्हणून त्याच्या चुकांवर त्यावेळच्या राज्यातील नेत्यांनी कधी पांघरूण घातलंय असं झालं नाही. बाळासाहेब असोत, पवार साहेब असोत की प्रमोदजी असोत किंवा कोणीही असोत, म्हणून महाराष्ट्राचं राजकारण वेगळं आहे अशी देशभर प्रतिमा होती,” असे ते पुढे म्हणाले.
पोस्टच्या शेवटी राज ठाकरे म्हणाले की, “आज तुम्ही हा आपला आहे ना मग त्यांनी काहीही केलं तरी घाल त्याला पाठीशी सुरु केलं आहेत. याने तुम्ही तुमची आणि महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहात असं वाटत नाहीये का ? तुमचे मंत्री रोज बेताल विधानं करत आहेत, त्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही. तुमचे इतर नेते असंवेदनशीलता उघडपणे दाखवतात त्यांना तुम्ही काही बोलत नाही . (बोलला असता तर परत त्यांची तीच चूक करायची हिम्मत झाली नसती. पण ते तसेच वागत आहेत यावरून समजतंय की तुम्ही त्यांना काहीच समज देत नाही आहात) तुमच्या मौनाचं नेमकं कारण काय आहे? तुमच्याकडून म्हणण्यापेक्षा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून काही संकेतांची अपेक्षा कायम असते. मग तो कुठल्या का पक्षाचा का असेना. त्याचा अपेक्षाभंग करू नका. अन्यथा देवेंद्र फडणवीस हा माणूस फक्त स्वकीयांच्या चुकांना पाठीशी घालणारा भाऊ इतकीच तुमची प्रतिमा राहील आणि यांत सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात चुकीचे पायंडे पडतील. खरंतर असं बेफाम वागणाऱ्यांकडून तुम्ही राजीनामे घ्यायला हवेत. पण तुम्ही ते का करत नाही आहात माहित नाही? वेडंवाकडं वागणाऱ्यांना फडणवीस जबर शासन करतात हे एकदा दाखवून द्या म्हणजे सगळेच सुतासारखे सरळ येतील.”
