Raj Thackeray : ‘मनसे कार्यकर्ते अतिरेकी किंवा रझाकार आहेत का? सहनशीलतेचा अंत पाहू नका’, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा

| Updated on: May 10, 2022 | 5:14 PM

महाविकास आघाडी सरकार आणि पर्यायानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरुन मनसैनिकांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मनसैनिकांना नोटीस, धरपकड, संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यावरील दाखल गुन्हे, या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना थेट इशारा दिलाय.

Raj Thackeray : मनसे कार्यकर्ते अतिरेकी किंवा रझाकार आहेत का? सहनशीलतेचा अंत पाहू नका, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा
उद्धव ठाकरे, राज ठाकरे
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. तसंच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेची कोंडी करण्याची एकही संधी राज ठाकरे आणि भाजप नेते सोडत नाहीत. अशावेळी महाविकास आघाडी सरकार आणि पर्यायानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावरुन मनसैनिकांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मनसैनिकांना नोटीस, धरपकड, संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) आणि संतोष धुरी यांच्यावरील दाखल गुन्हे, या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना थेट इशारा दिलाय. ‘आमचा संदीप देशपांडे आणि इतरही अनेक कार्यकर्त्यांना पोलीस असे काही शोधत आहेत, जणू ते पाकिस्तानातून आलेले अतिरेकी किंवा निजामाच्या हैद्राबाद संस्थानातले ‘रझाकार’ आहेत! अर्थात, महाराष्ट्र सैनिकांविरोधात ही अत्याचारी, दमनकारी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना कुणी दिलेत हे समस्त मराठीजन, तमाम हिंदूजन उघड्या डोळ्यांनी बघत आहेत’, असं टीकास्त्र राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर डागलं आहे.

‘सरकार बेभान होऊन अंगात आल्यासारखं वागतंय’

सर्व देशबांधवांना मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी मी पत्राद्वारे आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकार बेभान होऊन अंगात आल्यासारखं वागत आहे. देशाचे सर्वोच्च न्यायालय आणि विविध राज्यातील उच्च न्यायालयं यांनी दिलेल्या निर्णयांची अंमलबजावणी व्हावी यासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी दि. 4 मे रोजी ‘भोंगे उतरवा’ आंदोलन सुरू करण्यापूर्वीच ठिकठिकाणी त्यांची धरपकड करण्यात आली. तब्बल 28 हजार महाराष्ट्र सैनिकांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या, हजारोंना तडीपार केलं आणि अनेकांना तुरुंगात डांबलं. कशासाठी? ध्वनिप्रदूषण करणारे, लोकांना त्रास देणारे मशिदींवरचे अनधिकृत भोंगे उतरवले जाऊ नयेत यासाठी!

हे सुद्धा वाचा

‘अत्याचारी, दमनकारी कारवाईचे आदेश पोलिसांना कुणी दिले?’

गेला आठवडाभर महाराष्ट्र सैनिकांची दडपणूक करण्यासाठी राज्य सरकार ज्या पद्धतीने पोलीस बळाचा वापर करत आहे ते पाहता मला प्रश्न पडलाय की; मशिदींमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी ‘धरपकड मोहीम राज्य सरकारने किंवा पोलिसांनी कधी राबवली होती का? आमचा संदीप देशपांडे आणि इतरही अनेक कार्यकर्त्यांना पोलीस असे काही शोधत आहेत, जणू ते पाकिस्तानातून आलेले अतिरेकी किंवा निजामाच्या हैद्राबाद संस्थानातले ‘रझाकार’ आहेत! अर्थात, महाराष्ट्र सैनिकांविरोधात ही अत्याचारी, दमनकारी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना कुणी दिलेत हे समस्त मराठीजन, तमाम हिंदूजन उघड्या डोळ्यांनी बघत आहेत.

राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे; आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही!