ये अंदर की बात है, राणे कुटुंब हमारे साथ है; आता राजन साळवींचं प्रत्युत्तर

| Updated on: Oct 20, 2022 | 11:22 AM

राजकारणातील पातळी खालावत चालली आहे. काही विद्ध्वंसक मंडळींकडून चुकीच्या पद्धतीने आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अंगावर आल्यानंतर शिंगावर घ्यावाच लागतं ही भूमिका आमची आहे.

ये अंदर की बात है, राणे कुटुंब हमारे साथ है; आता राजन साळवींचं प्रत्युत्तर
ये अंदर की बात है, राणे कुटुंब हमारे साथ है; आता राजन साळवींचं प्रत्युत्तर
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

रत्नागिरी: भाजप नेते नितेश राणे (nitesh rane) आणि उद्धव ठाकरे गटाचे (uddhav thackeray) आमदार राजन साळवी (rajan salvi) यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. ये अंदर की बात है, राजन साळवी हमारे साथ है, असा दावा नितेश राणे यांनी केला होता. नितेश राणे यांच्या या दाव्याला राजन साळवी यांनीही त्याच शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे. ये अंदर की बात है, राणे कुटुंब हमारे साथ है, असा दावा राजन साळवी यांनी केला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात नितेश राणे आणि राजन साळवी यांच्यात शाब्दिक चकमकी झडण्याची चिन्हे दिसत आहेत.

राजन साळवी यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली. रत्नागिरी जिल्ह्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वर्चस्व कायम राहणार आहे. कोकणाचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा बालेकिल्ला कायम राखल्याबद्दल उद्धवजींनी पण अभिनंदन केलं, असं राजन साळवी यांनी सांगितलं.

भास्कर जाधव हे शिवसेनेचे आक्रमक नेते आहेत. जे त्यांच्या मनात असते. तेच त्यांच्या हृदयात आणि ओठांवर असते. भास्कर जाधव यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचं उत्तर देण्यास उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते सक्षम आहेत. भास्कर जाधव यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो, असं ते म्हणाले.

नितेश राणे हे आमचे विरोधक आहेत. बाळासाहेबांमुळे राणे कुटुंबीय मोठे झालं. मी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ आहे. मी कुठे जाणार नाही. पण मी असं म्हणेन की, अंदर की बात है, ये राणे कुटुंब हमारे साथ है, असा दावा त्यांनी केला.

राजकारणातील पातळी खालावत चालली आहे. काही विद्ध्वंसक मंडळींकडून चुकीच्या पद्धतीने आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अंगावर आल्यानंतर शिंगावर घ्यावाच लागतं ही भूमिका आमची आहे. कुणी अंगावर आला तर शिंगावर घेऊ, असा इशाराच त्यांनी दिला.

राजकारणाच्या पलिकडेही काही गोष्टी पाहिल्या पाहिजे. क्रीडा क्षेत्रासारखे काही क्षेत्रं राजकारणाच्या पलिकडची आहेत. त्यामुध्ये कोणीही राजकारण आणू नये, असं सांगतानाच महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही एकसंघ आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.