काँग्रेसकडून राज्यसभेसाठी रजनी पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल, महाविकास आघाडी नेत्यांना विजयाचा विश्वास

| Updated on: Sep 22, 2021 | 2:27 PM

राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसकडून आज रजनी पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रजनी पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.

काँग्रेसकडून राज्यसभेसाठी रजनी पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल, महाविकास आघाडी नेत्यांना विजयाचा विश्वास
काँग्रेसकडून राज्यसभेसाठी रजनी पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
Follow us on

मुंबई : काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसकडून आज रजनी पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रजनी पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. दुसरीकडे भाजपकडून संजय उपाध्याय यांनी राज्यसभेसाठी आज नामांकन अर्ज दाखल करण्यात आला आहे. (Rajani Patil’s nomination application filed by Congress for Rajya Sabha election)

रजनी पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर ही निवडणूक महाविकास आघाडी जिंकेल असा दावा एकनाथ शिंदे यांनी केलाय. तर एखाद्या सदस्यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत विरोधकांकडून उमेदवार दिला जात नाही. ही माहाराष्ट्राची परंपरा राहिली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आम्ही भाजपला विनंती करणार असल्याचं बाळासाहेब थोरात म्हणाले.

रजनी पाटलांचा उमेदवारी अर्ज बाद होणार?

दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी बोलताना हा दावा केला आहे. रजनी पाटील यांच्यावर काही ऑब्जेक्शन आहेत. छाननी करताना त्या बाहेर पडतील, असा दावा पाटील यांनी केला. मात्र, काय ऑब्जेक्शन आहे हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. मी कशाला सांगू. उद्यासाठी काही हवं की नाही, अशी सूचक प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.

सातव यांच्या पत्नीला तिकीट का नाही दिलं?

राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने उमेदवार देऊ नये, असं काँग्रेसने अप्रत्यक्ष म्हटलं होतं. त्यासाठी राज्याची परंपराही काँग्रेसने सांगितली होती. त्यावर पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महाराष्ट्राची परंपरा वगैरे तुम्हाला आठवत असेल तर सातव यांच्या पत्नीला तिकीट का दिलं नाही? राजीव सातव हे प्रविण दरेकर, सुधीर मुनगंटीवार, संजय उपाध्याय, देवेंद्र फडणवीसांचे परम मित्रं होते. त्यामुळे सातव यांच्या पत्नीला तिकीट मिळेल अशी आमची अपेक्षा होती. पण तुम्ही रजनी पाटलांना तिकीट दिलं, असं ते म्हणाले.

कोण आहेत रजनी पाटील?

रजनी पाटील ह्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. त्या राज्यसभेच्या खासदार होत्या. आता जम्मू आणि काश्मीरच्या त्या काँग्रेस प्रभारी आहेत. ठाकरे सरकारनं ज्या 12 नेत्यांची नाव विधान परिषदेवर घेण्यासाठी राज्यपालांकडे पाठवलेली आहेत. त्यात काँग्रेसनं रजनी पाटील यांचंही नाव दिलेलं आहे. 1996 साली त्या बीडमधून लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. राजकारणाची सुरुवात त्यांनी जिल्हा परिषदेतून केलेली आहे.

जेव्हा रजनी पाटलांनी राहुल गांधींना सुनावलं

काही दिवसांपूर्वी राहुल गांधी हे जम्मूच्या दौऱ्यावर होते. ह्या दौऱ्यात रजनी पाटील यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमोर भाषण केलं. राहुल गांधी व्यासपीठावर होते. रजनी पाटलांनी राहुल गांधींना तोंडावर काँग्रेसमध्ये नेमकं काय कमी आहे ते सांगितलं होतं. रजनी पाटील म्हणाल्या होत्या. ‘सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हे काँग्रेसचे शिपाई तुमच्यासाठी जीव द्यायलाही तयार आहेत. ती लढाईची ताकद दाखवण्यासाठीच ते इथं आलेत. तुम्ही मला इथं पाठवलत, सोनियाजींनी मला इथं पाठवलं. तर मी एकच गोष्ट आज इथं सांगू इच्छिते, काँग्रेस पार्टीनं खूप जणांना मोठं केलं. आम्ही सगळे इथं पदाधिकारी बसलेले आहोत. मंत्री राहीलेले बसलेत, केंद्रीय मंत्री झालेलेही आहेत इथं. आम्हाला ताकद देण्याचं काम काँग्रेस पार्टीनं केलं. आम्ही ज्यावेळेस म्हणतो की, आम्ही मोठे आहोत तर ती ताकद आम्हाला काँग्रेस पार्टीनं दिलीय. पण हा समोर बसलेले जे कार्यकर्ते आहेत ना, त्यांना कुणीच ताकद दिली नाही. त्यांना बळ देण्याची गरज आहे. त्यांना तादक द्यायला तुम्ही आम्हाला सांगता पण ते कुणीच देत नाही, तुम्हीही देत नाहीत. आणि हिच पार्टीची सर्वात मोठी कमजोरी आहे’.

इतर बातम्या :

काँग्रेसच्या राज्यसभेच्या उमेदवार रजनी पाटील यांचा अर्ज बाद होणार?, चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान; वाचा नेमकं काय म्हणाले?

चुकीचं काहीही केलं नाही, सोमय्या केवळ बदनामी करताहेत; अनिल परब यांचा दावा

Rajani Patil’s nomination application filed by Congress for Rajya Sabha elections