पंतप्रधान देशाची परंपरा विसरले, अहिंसक आंदोलनामुळेच देश स्वतंत्र – राजू शेट्टी

| Updated on: Feb 09, 2021 | 6:41 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत 'आंदोलनजीवी' हा शब्दप्रयोग केला. मोदींनी उल्लेख केलेल्या या शब्दावरुन आता जोरदार राजकारण रंगलं आहे.

पंतप्रधान देशाची परंपरा विसरले, अहिंसक आंदोलनामुळेच देश स्वतंत्र - राजू शेट्टी
राजू शेट्टी आणि नरेंद्र मोदी
Follow us on

पुणे : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत ‘आंदोलनजीवी’ हा शब्दप्रयोग केला. मोदींनी उल्लेख केलेल्या या शब्दावरुन आता जोरदार राजकारण रंगलं आहे. सर्वच विरोधी पक्ष पंतप्रधान मोदी आणि पर्यायानं भाजपवर तुटून पडल्याचं पाहायला मिळत आहे. राजधानी दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात गेल्या 76 दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. त्या आंदोलनात सहभागी झालेल्या काही आंदोलकांना मोदींनी हा टोला लगावला आहे. त्याला आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.(Raju Shetty criticizes PM Narendra Modi over farmers’ agitation)

‘पंतप्रधान मोदी यांनी राज्यसभेत जे व्यक्तव्य केलं ते पंतप्रधानपदाला शोभत नाही. कदाचित पंतप्रधान मोदी देशाची परंपरा विसरले आहेत. महात्मा गांधी यांनी अहिंसक आंदोलनाच्या माध्यमातूनच देश स्वतंत्र केला होता, हे विसरु नका. आंदोलकांची अशी हेटाळणी करत असाल तर हे बरोबर नाही’, असं प्रत्युतर राजू शेट्टी यांनी दिलं आहे. ‘सरकारने आंदोलन करणाऱ्यांना देशद्रोही ठरवलं आहे, याचा आम्हाला राग आहे. त्याच्या वेदनाही खूप होतात. मात्र हे सरकारच देशद्रोही आहे. त्यांनी 75 दिवसांपेक्षा अधिक काळ शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु ठेवलं आहे. शेतकऱ्यांचे रस्ते बंद करण्यासाठी खिळे ठोकण्याचा गंभीर प्रकार केला. त्यामुळे हे सरकारच खरं देशद्रोही आहे’, असा घणाघात राजू शेट्टी यांनी केला आहे.

शेतकऱ्यांनी ज्या कायद्याची मागणी केली होती तो कायदा आम्हाला मिळत नाही. उलट ज्या कायद्याची आम्ही मागणी केली नाह, असे काही कायदे फक्त ठराविक उद्योगपतींसाठी आमच्यावर लादले जात आहेत, असा गंभीर आरोपही शेट्टी यांनी केला आहे. राजू शेट्टी हे कोर्टाने बजावलेल्या वॉरंटवर हजर राहण्यासाठी आज इंदापुरात होते.

योगेंद्र यादवांचीही टीका

राजकीय विश्लेषक आणि शेतकरी आंदोलनात अग्रेसर असलेले योगेंद्र यादव यांनी आंदोलनजीवी शब्दावरुन पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. योगेंद्र यादव एका फेसबुक लाईव्हमध्ये बोलताना म्हणाले की, ‘पंतप्रधान मोदी स्वत: काही दिवसांपूर्वी जनआंदोलनाबाबत बोलत होते. काँग्रेस विरोधात ते जनआंदोलन करण्याची भाषा करत होते. मात्र, आता त्यांना आंदोलन खटकत आहे’.

‘कधी-कधी वाटतं की पंतप्रधान मोदींना काँग्रेसची खरी गरज आहे. जर काँग्रेस राहिली नाही तर पंतप्रधानांचं काय होईल?’, असंही यादव यांनी म्हटलंय. दुसऱ्यांच्या आधारावर जगणाऱ्याला परजीवी म्हणतात. पंतप्रधान मोदी यांनी आज एक नवा शब्द जन्माला घातला आहे. तो म्हणजे आंदोलनजीवी. ‘त्यावर पंतप्रधान मोदी आम्हाला घाबरत आहेत. ते खूप मोठ्या खुर्चीवर बसले आहेत. अशावेळी त्यांना अशा पद्धतीचे बोल शोभा देत नाहीत’, अशी टीका योगेंद्र यादव यांनी केली आहे.

संबंधित बातम्या :

श्रमजीवी, बुद्धिजीवी ऐकले होते, आता आंदोलनजीवी अशी नवी जमात आलीय: मोदी

PM Modi Speech : मोदी है मौका लिजिए, पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 मुद्दे

Raju Shetty criticizes PM Narendra Modi over farmers’ agitation