राष्ट्रवादी सोडू नका, साताऱ्यात जाऊन राजू शेट्टींचं उदयनराजेंना साकडं

| Updated on: Sep 04, 2019 | 6:09 PM

सर्व नेत्यांचा ओढा हा शिवसेना आणि भाजपकडे असताना महाराष्ट्राला तुमच्यासारख्या भक्कम नेत्याची गरज आहे, असं साकडं राजू शेट्टींनी (Raju Shetty) घातलं आणि राष्ट्रवादी न सोडण्याची विनंती केली.

राष्ट्रवादी सोडू नका, साताऱ्यात जाऊन राजू शेट्टींचं उदयनराजेंना साकडं
Follow us on

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje bhosale) भाजपात जाणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी त्यांची पक्ष सोडू नये यासाठी मनधरणीही केली. सातारा शासकीय विश्रामगृहात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी (Raju Shetty satara) यांनी उदयनराजेंसोबत अर्धा तास चर्चा केली. सर्व नेत्यांचा ओढा हा शिवसेना आणि भाजपकडे असताना महाराष्ट्राला तुमच्यासारख्या भक्कम नेत्याची गरज आहे, असं साकडं राजू शेट्टींनी (Raju Shetty satara) घातलं आणि राष्ट्रवादी न सोडण्याची विनंती केली.

महाराष्ट्राला भक्कम विरोधी पक्षातील नेत्यांची गरज आहे. जनसामन्यांना वाली कोण हा प्रश्न उपस्थित होतोय. जनसामान्यांचा आवाज उठवणारे काही मोजकेच खासदार आहेत. विरोधी पक्षात तुमच्यासारखे (उदयनराजे) लोक हवे आहेत. त्यामुळे तुम्ही भाजपात जाण्याचा निर्णय घेऊ नका, अशी विनंती राजेंना केली असल्याची माहिती राजू शेट्टींनी दिली. शिवाय उदयनराजेंनी अजून भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

अमोल कोल्हेंची शिष्टाई निष्फळ

गणेश चतुर्थीच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनीही उदयनराजेंचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण बैठकीतून बाहेर आल्यानंतर ‘मावळा छत्रपतींचं मन वळवू शकत नाही’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. यानंतर उदयनराजेंनीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका करत भाजप प्रवेशाचे संकेत दिले होते. आघाडीच्या सत्ता काळात माझं एकही काम केलं गेलं नाही, लोकांसाठी काही तरी निर्णय घ्यावाच लागेल, असं ते म्हणाले होते.