‘..अन्यथा नृसिंहवाडीला जलसमाधी घेऊ’, पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राजू शेट्टींचा सरकारला इशारा

| Updated on: Aug 23, 2021 | 6:24 PM

राजू शेट्टी यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. त्याचबरोबर पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीबाबतचा जीआर बदला, अन्यथा नृसिंहवाडीत जलसमाधी घेऊ असा इशाराच शेट्टी यांनी राज्य सरकारला दिलाय.

..अन्यथा नृसिंहवाडीला जलसमाधी घेऊ, पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राजू शेट्टींचा सरकारला इशारा
राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना
Follow us on

कोल्हापूर : राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेट्टी यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. त्याचबरोबर पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीबाबतचा जीआर बदला, अन्यथा नृसिंहवाडीत जलसमाधी घेऊ असा इशाराच शेट्टी यांनी राज्य सरकारला दिलाय. (Raju Shetty’s warning of Jalasamadhi, Agitation at Kolhapur Collector office)

महापुराला एक महिना होऊन केला तरी सरकारनं पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली नाही. म्हणून आता आम्ही 8 दिवसांची मुदत देत आहोत. पंचनामे झाले आहेत, नुकसानाचा आकडाही आला आहे. आता जीआर बदला. 1 सप्टेंबरला आम्ही चिखली ते नृसिंहवाडीपर्यंत दिंडी काढणार आणि तिथे सामुहिक जलसमाधी घेणार, असा इशाराच शेट्टी यांनी राज्य सरकारला दिलाय. जिल्ह्यातील मंत्र्यांनी कारण नसताना या मोर्चाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला जशास तसं प्रत्युत्तर दिलं. आम्ही ईडीला घाबरत नाही. आता राजकीय निर्णय घेण्याची वेळ नाही. राजकारण हे आमचं साधन आहे, साध्य नाही, अशा शब्दात शेट्टी यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय.

महाविकास आघाडी सरकारला सूचक इशारा

आमच्यासमोर सर्व पर्याय खुले आहेत. आम्ही आजही महाविकास आघाडीचा घटकपक्ष आहोत, पण त्यांचा गुलाम नाही. जे चुकीचं असेल ते बोलणारच, अशा शब्दात शेट्टी यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांनाही सूचक इशारा दिल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात पूरग्रस्त शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात हजारोच्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी राजू शेट्टी यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. जे सूर्याला दिसत नाही ते जयंत पाटील यांना दिसतं. मोठ्या योजना आणून टेंडर काढण्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना रस आहे, अशी घणाघाती टीका शेट्टी यांनी केलीय. तसंच पूर आला म्हणून सरकारी नोकरदारांचे पगार थांबले का? तुम्ही आम्हाला नाराज केलं, अपेक्षाभंग केला, अशी खंतही शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.

शेट्टींची जयंत पाटील, मुख्यमंत्र्यांवर टीका

कृष्णा, पंचगंगा नदीतील महापुराचं पाणी बोगद्यातून दुष्काळी भागाकडे वळवण्याच्या घोषणा ही निव्वळ धूळफेक आहे. अशा मोठ्या योजना आणून पैसे खाण्याचा हा उद्योग आहे. जयंत पाटील यांची ही योजना कधीच पूर्ण होणार नाही, अशी टीकाही शेट्टी यांनी यावेळी केलीय. पूरग्रस्तांना पॅकेज देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. पण अजून कसलीही मदत मिळाली नाही. मदत मिळण्यासाठी मी ठाकरे यांच्याकडे गेलो होतो पण भेट दिली गेली नाही. अजूनही मदत मिळाली नाही. पूरानं शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. शाळा, कॉलेज सुरु झाले असल्यानं फी कशी भरायची? असा सवाल यावेळी शेट्टींनी विचारलाय. शेतकऱ्यांना 2019 साली आलेल्या महापुराप्रमाणे मदत मिळायला हवी, अशी मागणीही यावेळी शेट्टींनी केलीय.

‘अलमट्टी धरण महापुराचं एक कारण’

महापुराचं एक कारण अलमट्टीही आहे. तज्ज्ञ कितीही नाही म्हणत असले तरी आम्ही सिद्ध करायला तयार आहोत. लोकांची फसवणूक करण्यापेक्षा आम्ही सांगतो त्या पद्धतीनं व्यवहारिक उपाय करा. पूरग्रस्त शेतकऱ्यांचे पुनर्वसन करणार आहात की नाही? रस्ते करण्यासाठी चौपटीने पैसे देता मग पूरग्रस्तांना पैसे का देत नाही? असा संतप्त सवाल शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारलाय. तर दिल्लीत बसून सोयाबीन आयात करायचा निर्णय घेतला आणि शेतकऱ्यांना निम्मा तोटा झाला, असा आरोप शेट्टी यांनी केलाय.

इतर बातम्या :

‘अजितदादा काय म्हणतात त्याला काडीची किंमत नाही’, बैलगाडा शर्यतीबाबत गोपीचंद पडळकरांचा टोला

गुळाच्या ढेपेला मुंगळे चिटकलेत, देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवर हल्ला

Raju Shetty’s warning of Jalasamadhi, Agitation at Kolhapur Collector office