“महाराष्ट्राच्या दुश्मनांना मशालीचा पहिला झटका बसलाय, पुढे-पुढे पाहा… बरंच पोळायचंय, बरंच भाजायचंय”

| Updated on: Oct 18, 2022 | 9:10 AM

अंधेरी पोटनिवडणुकीतील घडामोडींवरून आजच्या सामनाच्या अग्रलेखातून शिंदेगट आणि भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या दुश्मनांना मशालीचा पहिला झटका बसलाय, पुढे-पुढे पाहा... बरंच पोळायचंय, बरंच भाजायचंय
Follow us on

मुंबई : भाजपने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध झाली आहे. ठाकरे गटाच्या नेत्या ऋतुजा लटके यांची विधानसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. या सगळ्या घडामोडींवरून आजच्या सामनाच्या अग्रलेखातून शिंदेगट (Eknath Shinde) आणि भाजपवर (BJP) निशाणा साधण्यात आला आहे. “महाराष्ट्राच्या दुश्मनांना मशालीचा पहिला झटका बसलाय, पुढे-पुढे पाहा… बरंच पोळायचंय, बरंच भाजायचंय”, असं सामनात (Saamana Editorial) म्हणण्यात आलं आहे.

“अंधेरीच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या ‘मशाली’चा पहिला चटका महाराष्ट्राच्या दुष्मनांना बसला आहे. पुढे पुढे पहा. आणखी बरेच पोळायचे आणि भाजायचे बाकी आहे. शिवसेनेचे लाखो अग्निवीर पेटलेल्या मशालीची पहिली विजयपताका घेऊन आता आणखी त्वेषाने बाहेर पडतील”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

“याच धगधगत्या मशालीने स्वाभिमानाचे, अस्मितेचे, अन्यायाविरुद्धचे यज्ञकुंड पेटवून त्यात महाराष्ट्र-दुष्मनांच्या, लाचार मिंध्यांच्या समिधा अर्पण करतील! पेटलेली ही मशाल आता महाराष्ट्र आणि देश उजळवून टाकेल! मशालीच्या अग्निप्रकाशात भविष्यातील शिवसेनेचे तमाम विजयमार्ग आम्हाला स्पष्ट दिसत आहेत!”, असं म्हणत सामनातून ठाकरेगटाचा ‘विजयपथ’ दर्शवण्यात आला आहे.

भाजपचे माघारी नाटय़ हे दिसते तसे सरळ नाही. पराभव झाला तर सरकारला मोठी किंमत चुकवावी लागेल हे त्यांच्या लक्षात आले असावे आणि शिवसेनेची मशाल जिंकणारच आहे याची खात्री भाजपला पटली असावी. शिवसेनेची ही ‘भडकलेली मशाल’ बेइमानीचे इमले जाळून टाकेल. त्यापेक्षा आता माघार घ्यावी हेच बरे, हा सुज्ञ विचार भाजप व मिंधे सरकारने केलेला दिसतो, असं म्हणत शिंदेगट आणि भाजपवर थेट निशाणा साधण्यात आला आहे.

स्वर्गीय रमेश लटके यांच्या सुविद्य पत्नी ऋतुजा लटके यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. खरे म्हणजे अशा दुःखद प्रसंगी राजकीय भेदाभेद विसरून, सगळय़ांनी एकत्र येऊन आधीच ही पोटनिवडणूक बिनविरोध करायला हरकत नव्हती, पण बिनविरोध करायचे राहिले बाजूला, ऋतुजा लटके यांच्या मार्गात अडथळे निर्माण करण्यासाठी भाजप व मिंधे गटाची अभद्र हातमिळवणी झाली, असं म्हणत ऋतुजा लटकेंच्या राजीनाम्यावरून झालेल्या राजकारणावरही सामनातून भाष्य करण्यात आलं आहे.