Sanjay Raut Ed Inquiry : “भांगाच्या नशेतले स्वप्न!, राऊतांची अटक बेकायदेशीर”, सामनातून हल्लाबोल

| Updated on: Aug 02, 2022 | 7:01 AM

Saamana Editorial : राऊतांची अटक बेकायदेशीरच- सामना

Sanjay Raut Ed Inquiry : भांगाच्या नशेतले स्वप्न!, राऊतांची अटक बेकायदेशीर, सामनातून हल्लाबोल
संजय राऊत
Follow us on

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांची ईडी चौकशी, त्यांना झालेली अटक आणि एकंदरित सगळ्या प्रकरणावर (Sanjay Raut Ed Inquiry) शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या सामनामधून टीका करण्यात आली आहे. ” ही कारवाई भांगाच्या नशेतले स्वप्न!, राऊतांची अटक बेकायदेशीर”, असा या अग्रलेखाचा मतितार्थ आहे. “पळपुट्या नामर्द लोकांमुळे शिवरायांचा महाराष्ट्र बदनाम होत आहे. महाराष्ट्रातील जनता ही शिवरायांचे नाव सांगते तेव्हा ती निधड्या छातीने, न लटपटता ‘ईडी’ असो की आणखी काही, बेडरपणे सामना करते. कर नाही त्याला डर कशाला म्हणायचे ते यालाच व हा बेडरपणा संजय राऊत यांनी दाखवला. सत्तेचा अमरपट्टा बांधून कोणीच जन्मास आलेले नाही. शिवरायांचे हे राज्य बुडावे, त्याआधी ते नामर्द करावे असे कुणास वाटत असेल तर ते भांगेच्या नशेत आहेत, भांगेच्या नशेतील स्वप्न ते पाहत आहेत. महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील!”, असंही सामना अग्रलेखात (Saamana Editorial) म्हणण्यात आलं आहे.

भांगेच्या नशेतले स्वप्न

महाराष्ट्रावर तर एकापाठोपाठ घाव घालण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. महाराष्ट्र तोडायचा तर आधी शिवसेनेस संपवायलाच हवे. शिवसेना संपवायची तर फोडाफोडी, दहशत निर्माण करायची व त्याआधी संजय राऊत यांच्यासारखे लढाऊ व प्रखर बोलणारे, लिहिणारे, राज्यभर फिरणारे नेते खोट्या प्रकरणात गुंतवून तुरुंगात टाकायचे, हे असले उद्योग सुरू आहेत. अर्थात महाराष्ट्र काय किंवा शिवसेना काय कधीही झुकणार नाही. किती जणांना तुरुंगात टाकाल? तुरुंग कमी पडतील अशी वेळ तुमच्यावर आल्याशिवाय राहणार नाही. सत्तेचा अमरपट्टा बांधून कोणीच जन्मास आलेले नाही. शिवरायांचे हे राज्य बुडावे, त्याआधी ते नामर्द करावे असे कुणास वाटत असेल तर ते भांगेच्या नशेत आहेत, भांगेच्या नशेतील स्वप्न ते पाहत आहेत. महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील!

हे सुद्धा वाचा

बेकायदेशीरपणे अटक!

संजय राऊतांना अटक होताच गिरीश महाजन हे अत्यानंदाने भुईनळे उडवीत म्हणाले, “एकनाथ खडसे यांना कोर्टाने क्लीन चिट दिलेली नाही व तेदेखील त्यांच्या जावयांच्यासोबत जेलमध्ये जातील.” याचा काय अर्थ घ्यावा? आपण देशातील कायद्याचे, राज्यघटनेचे बाप झालात की कायद्यास आपण कोठीवर नाचवून त्यावर दौलतजादा करीत आहात? राजकीय विरोधक, मग त्या सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार असतील नाहीतर संजय राऊत, आमच्या विरुद्ध परखड बोलाल किंवा विरोधकांची एकजूट करण्याची हालचाल कराल तर याद राखा, असेच एकप्रकारे स्पष्टपणे बजावण्याचा हा प्रकार आहे. शिवसेनेचे अनिल परब यांच्या नसलेल्या व अद्यापही सुरू न झालेल्या रिसॉर्टमधून समुद्रात पाणी सोडले या भयंकर गुन्ह्याखाली परबांची कठोर चौकशी होते. 10-11 वर्षांपूर्वीच्या 50-55 लाखांच्या व्यवहाराचे प्रकरण बनावट पद्धतीने उभे करून संजय राऊत यांना तुरुंगात पाठवले जाते. 2004 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातील वडिलोपार्जित घराबाबत श्री. शरद पवार यांना आयकर विभाग आता नोटिसा पाठवतो. त्याच वेळेला नीरव मोदी, मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या, ललित मोदी यांच्यासारखे असंख्य आर्थिक गुन्हेगार परदेशात पळून जातात. मुळात ज्यांच्यावर ‘ईडी’ने कठोर कारवाई करावी असे असंख्य महात्मे आज सत्ताधारी पक्षात विराजमान आहेत. इतकेच कशाला, शिवसेनेतून शिंदे नामक गटात जे आमदार, खासदार सामील झाले व जे स्वतची पोकळ छाती लपवून हिमतीचे बोल बोलत आहेत त्यातील अनेकांवर ‘ईडी’, आयकर खाते यांच्या कारवायांचा फक्त बडगाच उगारला गेला नव्हता तर त्यांच्या अटकेपर्यंत प्रकरण पोहोचले होते. आता हे सर्व लोक पुण्यात्मे झाले व ‘कर नाही त्याला डर कशाला’ अशा चिपळ्या वाजवत आहेत.पण त्यामुळे महाराष्ट्र बदनाम होत आहे, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.