महाराष्ट्रातील संकटात केंद्रीय हात नाही, पण सरकारे पाडण्यासाठी निधी वेळेत : सामना

| Updated on: Jun 13, 2020 | 8:37 AM

ज्या पद्धतीने मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार पाडले, त्याच प्रकारे राजस्थानमधील गेहलोत सरकार पाडण्यासाठी भाजप सुरुंग लावत असल्याचे धक्के आता जाणवू लागले आहेत, असा घणाघात 'सामना'तून करण्यात आला आहे. (Saamana Editorial Criticises BJP for destabilizing opposition governments)

महाराष्ट्रातील संकटात केंद्रीय हात नाही, पण सरकारे पाडण्यासाठी निधी वेळेत : सामना
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रातील संकटात केंद्रीय हात अजून पोहोचलेला नाही, परंतु सरकारे पाडण्यासाठी पथके आणि निधी मात्र पोहोचत आहे, अशा शब्दात ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. (Saamana Editorial Criticises BJP for destabilizing opposition governments)

“देशात सध्या कोरोनाचे संकट मानवी जीवनाचा घास गिळत असताना दिल्लीतील राज्यकर्ते पक्षाला विरोधकांची सरकार पाडण्याची थेरं सुचणे हे धक्कादायक आहे. देशात एकाच दिवशी 10 हजार रुग्ण व्हावेत, यावर केंद्र सरकार चिंता करायला तयार नाही. महाराष्ट्रात तुफानी वादळाने कोकण किनारपट्टीवर लोकांचे अतोनात नुकसान झाले. या संकटात केंद्रीय मदतीचा हात अजून पोहोचलेला नाही, पण विरोधकांची सरकारे पाडण्यासाठी पथके व निधी मात्र पोहोचत आहे. पंतप्रधान मोदी यांनी संकटाचे रुपांतर संधीत करण्याची हीच ‘योग्य’ वेळ असल्याचे मत व्यक्त केले. त्यांच्या भक्तांनी ‘मोदी उवाच’चा अनर्थ केला. मोदींनी संधीसाधूची एकदा शाळा घ्यावी हेच बरे” अशी टीका ‘सामना’च्या अग्रलेखात करण्यात आली आहे.

“कोरोनाचे संकट हीच संधी मानून ज्या पद्धतीने राजस्थानमधील स्थिर सरकारचे पाय ओढायला सुरुवात केली आहे. ज्या पद्धतीने मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार पाडले, त्याच प्रकारे राजस्थानमधील गेहलोत सरकार पाडण्यासाठी तिथे भाजप सुरुंग लावत असल्याचे धक्के आता जाणवू लागले आहेत.” असा घणाघातही करण्यात आला आहे.

“कोरोनाशी युद्ध सुरु झाले असतानाच भाजपने ज्योतिरादित्य शिंदे यांच्या गटाचे बावीस आमदार फोडले आणि संकटातील संधीचे सोने करुन दाखवले. या बदल्यात शिंदे समर्थकांना काही फुटकळ मंत्रिपदे मिळाली. स्वतः शिंदे यांना केंद्रात मंत्रिपदाचे गाजर दाखवण्यात आले, पण कोरोना संकटामुळे ही गाजराची शेती सुकली आहे. आता या गाजरांचा साठा राजस्थानात पाठवला आहे आणि तिथे संधीचे सोने करण्याचे पिक निघेल काय, यासाठी पेरणी आणि खतांची फवारणीही सुरु झाली आहे” असंही ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

(Saamana Editorial Criticises BJP for destabilizing opposition governments)