मंदिरं बंद ठेवून बार सुरू करणं हे सरकारचं धोरणच आहे, सदाभाऊ खोत यांची टीका

मंत्रालयात दारुच्या बाटल्या सापडल्या आहेत. त्यावरून रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. (sadabhau khot)

मंदिरं बंद ठेवून बार सुरू करणं हे सरकारचं धोरणच आहे, सदाभाऊ खोत यांची टीका
सदाभाऊ खोत
| Edited By: | Updated on: Aug 10, 2021 | 4:16 PM

मुंबई: मंत्रालयात दारुच्या बाटल्या सापडल्या आहेत. त्यावरून रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. हे काही नवीन नाही. मंदिर बंद ठेवून बार सुरू करणं हे सरकारचं धोरणच आहे. त्यामुळे त्यात काहीच नवीन नाीही, असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे. (sadabhau khot criticizes maharashtra government over Liquor Bottles found in Mantralaya)

सदाभाऊ खोत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला. यावेळी त्यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही राज्य सरकारवर जोरदार टीका केली. 15 वर्ष सत्ता असताना ज्यांनी धनगर आरक्षण दिलं नाही, त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर उगाच टीका करू नये. फडणवीसांनी जोपर्यंत धनगरांना आरक्षण देत नाही तोपर्यंत आदिवासींना ज्या सवलती आहेत त्या सगळ्या सवलती धनगरांना लागू केल्या होत्या. त्यामुळे आता या सरकारने धनगर आरक्षणासंदर्भात भूमिका घ्यावी, असं आवाहन खोत यांनी केलं.

राज्याने डेटा गोळा करावा

ओबीसीच्या डेटावरूनही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. केंद्राकडे जो डेटा तो यांच्याच सरकारमधला डेटा आहे. त्यात खूप सार्‍या चुका आहेत. त्यामुळे तो डेटा देऊ शकत नाही असे सांगितल्यानंतर सुद्धा त्या संदर्भात मागणी का होत आहे हाच महत्त्वाचा प्रश्न आहे?, असा सवालही त्यांनी केला. सरकारने राज्य मागास आयोगाची स्थापना केलेली आहे. त्यामुळे त्यांनी हा डेटा गोळा करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

राऊतांना सल्ला

यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली. राऊतांनी भाजपाबाबत बोलण्यापेक्षा स्वतःच्या सरकार संदर्भात बोलावं. राऊतांनी पश्चिम महाराष्ट्रात पूरग्रस्तांसाठी मदतीला जावं. मग त्यांना त्यांच्या वेदना कळतील. त्यांनी पूरग्रस्तांसाठी मदत यात्रा काढावी, असा सल्लाही त्यांनी राऊतांना दिला.

दरेकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्रं

मंत्रालयात दारूच्या बाटल्यांचा खच पाहायला मिळत आहे. ही महाराष्ट्रातील परंपरेला काळीमा फासणारी घटना असून या दारूच्या बाटल्या मंत्रालयात आल्याच कशा? याची चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली. तसेच या गंभीर प्रकरणाची अप्पर मुख्य सचिव (गृह) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करुन 15 दिवसांच्या आत उच्चस्तरिय चौकशी करण्याची मागणीही दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.

राज्याचा गाडा ज्या मंत्रालयातून हाकला जातो तेथे जर सर्वसामान्यांना प्रवेश करायचा असेल तर येथील सुरक्षा यंत्रणांचा सामना करावा लागतो. त्यांची चौकशी केली जाते. मात्र मंत्रालयाची सुरक्षा यंत्रणा भेदून या दारूच्या बाटल्या आत आल्याच कशा, असा सवाल उपस्थित करताना दारूच्या बाटल्या मंत्रालयामध्ये मिळणे ही दुर्दैवी, चीड आणणारी व शरम आणणारी अशी घटना आहे, अशी टीका त्यांनी केली. (sadabhau khot criticizes maharashtra government over Liquor Bottles found in Mantralaya)

 

संबंधित बातम्या:

आरं बाबा ज्याची तुला भीती नाही, ते वारंवार कशाला बोलतो, चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

VIDEO: चंदनाचा पाट, सोन्याचं ताट दिलं, पण ताटात काहीच नाही, खायचं काय?; विनायक राऊतांचा केंद्रावर हल्ला

कडोकोट सुरक्षा तरीही मंत्रालयात दारुच्या बाटल्या कशा? प्रविण दरेकर म्हणतात….

(sadabhau khot criticizes maharashtra government over Liquor Bottles found in Mantralaya)