Sambhaji Raje : ‘या धनंजय मुंडेमध्ये असं काय आहे, की त्याला…’, संभाजी राजे सरळ बोलले

Sambhaji Raje : "धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्यात अर्धातास चर्चा झाली. एवढी चर्चा करता, म्हणजे काहीतरी विषय असणारच ना.नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायला गेलो होतो, आम्ही मूर्ख आहोत का? हे सगळं बंद करा" असं संभाजी राजे यांनी सुनावलं.

Sambhaji Raje : या धनंजय मुंडेमध्ये असं काय आहे, की त्याला...,  संभाजी राजे सरळ बोलले
Sambhaji Raje
| Updated on: Jan 07, 2025 | 12:59 PM

“सात जणांचा म्होरक्या जो वाल्मिक कराड त्याला खंडणीच्या माध्यमातून अटक केलीय. त्यावर आम्ही गप्प बसणार नाही. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या पटलावर सांगितलं की, या सात जणांना अटक करणार त्यापाठोपाठ वाल्मिक कराडला अटक करणार. काल राज्यपालांना भेटलो. मुख्यमंत्र्यांचा सुद्धा वेळ मागितलेला आहे. कराडवर खंडणीच जे कलम लावलय त्यापेक्षा हत्येच कलम 302 लावलं पाहिजे” अशी मागणी संभाजी राजे यांनी केली. “ही सगळी माणस कोणाची आहेत? वाल्मिक कराड जवळचा आहे, हे धनंजय मुंडे स्वत: मान्य करतात. त्यांचे व्यावसायिक अकाऊंट एकत्र आहेत” असा आरोप संभाजी राजे यांनी केला.

“धनंजय मुंडे यांनी मोठ्या मनाने राजीनामा दिला पाहिजे. अशोक चव्हाण, आर.आर.पाटील यांनी आधी राजीनामा दिला, मग ते पुन्हा सत्तेत आले. तुम्ही सुद्धा तसेच पुन्हा सत्तेवर या. वाल्मिक कराड तुमचा जवळचा माणूस आहे, हे मान्य करता तरीही हे सर्व चालू आहे. मला आश्चर्य आहे, मुख्यमंत्री, अजित पवार यावर शांत कसे? यांना संरक्षण का देताय? या धनंजय मुंडेमध्ये असं काय आहे, त्याला एवढं घाबरताय. कुठल्याही सामान्य माणसाला बीडमध्ये विचारलं, हे सात जण कोणाचे? वाल्मिक कराड कोणाचा? उत्तर एकच येणार, सरकार का घाबरतय?” अशी टीका संभाजी राजे यांनी केली.

ही माणुसकीची हत्या

“ओबीसीमध्ये आहे, म्हणून धक्का द्यायच नाही का? काल सर्वपक्षीय राज्यापालांना भेटले, त्यामध्ये ओबीसी सुद्धा होते. ओबीसी, मराठा या पलीकडचा विषय आहे. ही माणुसकीची हत्या आहे. महाराष्ट्रभर हे पसरलं, तर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला हे परवडणार आहे का?. संतोष देशमुख यांचा भाऊ, मुलगी यांना न्यायासाठी मुख्यमंत्र्यांना भेटायला जावं लागतं हे चुकीच आहे” असं संभाजी राजे म्हणाले.

आम्ही मूर्ख आहोत का?

“अजितदादांच मला आश्चर्य वाटतं. परखडपणे विषय मांडता. छोट्यात छोट्या मुलाला विचारलं, यात दोषी कोण? खून कोणी केला? सगळं सांगतिलं, तरी अभय देता. काल सकाळी राज्यपालांना भेटलो. त्यानंतर मंत्रालयात गेलो होतो, त्यावेळी धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्यात अर्धातास चर्चा झाली. एवढी चर्चा करता, म्हणजे काहीतरी विषय असणारच ना.नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायला गेलो होतो, आम्ही मूर्ख आहोत का? हे सगळं बंद करा” असं संभाजी राजे यांनी सुनावलं.