गाफिल राहू नका, ही गावकी, भावकीची निवडणूक..; अजित पवारांचा कार्यकर्त्यांना आदेश नेमका काय?
Ajit Pawar on Sangali Loksabha Election 2024 : मतदारांना घरा बाहेर आणा अन्... ; अजित पवारांचा कार्यकर्त्यांना नेमका काय आदेश? पुण्यात बोलताना अजित पवार नेमकं काय म्हणाले? सांगलीत बोलताना पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना काय आवाहन केलं? वाचा सविस्तर...
लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता रंगात आला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज आज भरण्यात आला. यानंतर अजित पवार हे सांगलीला प्रचारासाठी गेले. यावेळी संबोधित करताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आणि पर्यायाने महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आवाहन केलं. तसंच काही सूचना दिल्या. आताची लोकसभेची निवडणूक ही गावकीची आणि भावकीची निवडणूक नाही. देशाची निवडणूक आहे. कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये. कमळाच्या समोरचं बटण दाबायला लावायचं आहे. कारण नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर देशाची शान वाढली आहे, असं अजित पवार म्हणालेत. महायुतीच्या सांगलीतील रॅलीत बोलताना अजित पवार यांनी हे आवाहन केलं आहे.
“गावकी भावकीची निवडणूक नाही!”
आताची निवडणूक ही गावकी भावकीची निवडणूक नाही. 140 कोटी जनतेचा कारभार हातात द्यायचा आहे. उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनो, गाफिल राहू नका. मतदारांना बाहेर आणून ते कमळावर कसे मतदान करतील हे बघा… खासदारांना निवडून का देतो? तर केंद्रातील योजना राबवता येतात. आता टेंभू, ताकारी, म्हैसाळ, पुरंदरसह अनेक योजना सोलर पॅनेलवर करण्याचा निर्णय घेतला. या योजनांसाठी लागणाऱ्या विजेची बचत होईल. विजेचे शेतीचे पहिले दर होते तेच ठेवायचे, असा आम्ही निर्णय घेतला.हे शेतकऱ्यांचे सरकार आहे, असं अजित पवार यावेळी म्हणाले.
त्याबद्दल दिलगिरी- अजित पवार
आता इथं यायला वेळ लागला. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली बारामती, सातारा करून यायला वेळ लागला. गावकी भावकीची निवडणूक नाही. नरेंद्र मोदी सर्व जाती धर्म घटकाला मदत करतात. बळीराजाला अधिक मदत करण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे. सोलर पॅनलवर सिंचन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. वीज घेऊन त्याची भरपाई सोलरच्या माध्यमातून करणार आहे, असं आश्वासन अजित पवार यांनी सांगलीकरांना दिलं.
“हे शेतकरी हिताचं सरकार”
अनेक वर्षांपासून सहकार क्षेत्रात काम करत आहे. केंद्र सरकारने इन्कम टॅक्स लावला, 20 वर्ष लावला. जे-जे अर्थमंत्री असल्याचे त्यांना भेटलो पण त्यांनी तो काढला नाही. केंद्रात नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचं सरकार आलं. त्यानंतर आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत अमित शाह यांची भेट घेतली. साखर कारखान्यांचे 15 हजार कोटी आणि 10 हजार कोटींचे मुद्दल माफ केली. साखर 31 रुपयांच्या खाली विकायचे नाही, असे आदेश आहेत. हा शेतकऱ्यांचा फायदा नाही का?, असा सवाल अजित पवार यांनी केला.