भाजपचाच मुख्यमंत्री होणार होता, आता काय झालं, संजय राऊतांची भाजपला कोपरखळी

| Updated on: Nov 10, 2019 | 7:19 PM

भाजपने राज्यपालांच्या विचारणेनंतर सरकार स्थापनेस नकार दिल्यानंतर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut on government formation) भाजपला कोपरखळी लगावली आहे.

भाजपचाच मुख्यमंत्री होणार होता, आता काय झालं, संजय राऊतांची भाजपला कोपरखळी
Follow us on

मुंबई: भाजपने राज्यपालांच्या विचारणेनंतर सरकार स्थापनेस नकार दिल्यानंतर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut on government formation) भाजपला कोपरखळी लगावली आहे. कालपर्यंत भाजप आमचाच मुख्यमंत्री होणार असं म्हणत होते. मग आज त्यांनी नकार का दिला, यानंतर त्यांचा मुख्यमंत्री कसा होणार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार कसे बनणार असे अनेक प्रश्न करत संजय राऊत यांनी (Sanjay Raut on government formation) भाजपला घेरले.

संजय राऊत म्हणाले, “आम्ही विरोधी पक्षात बसू पण शिवसेनेला ठरल्याप्रमाणे अडीच वर्षे मुख्यमंत्री पद देणार नाही, यातच भाजपचा अहंकार दिसतो. भाजपला मुख्यमंत्रीही बनवायचा होता आणि शिवसेनेसोबतचं वचनही पाळायचं नाही. उद्धव ठाकरे वारंवार सांगत आहेत आणि ते आजही म्हणालेत की मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार. सत्ता स्थापनेच्या शिवसेनेच्या दाव्यावर उद्या बोलू.”

चंद्रकांत पाटील म्हणाले, “यावेळीच्या विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, रिपाइं, रासप, शिवसंग्राम, रयत या महायुतीला जनतेने भरगोस जनादेश दिला. त्यामुळे राज्यपालांनी भाजपला सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिले. आम्ही निवडणूक महायुती म्हणून लढलो, जनादेश देखील महायुतीला दिला. मात्र, शिवसेना सोबत येत नसल्याने आम्ही राज्यपालांना सत्तास्थापनेस नकार दिला आहे. त्यामुळे राज्यपाल यापुढे काय निर्णय घेणार हे पाहावे लागणार आहे.”

जनतेने दिलेल्या जनादेशाचा अपमान करुन शिवसेनेला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊन सरकार स्थापन करायचं असेल, तर त्यांना आमच्या खूप खूप शुभेच्छा, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे आता राज्यपाल शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी विचारणा करणार का आणि त्यानंतर शिवसेना सत्तास्थापन करणार का हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.

विशेष म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादीने अद्याप आपली भूमिका गुलदस्त्यातच ठेवली आहे. त्यामुळे शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी पाठिंबा देणार की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे. शिवसेनेकडून काय हालचाली होतात हेही पाहावं लागणार आहे.