
Sanjay Raut Criticise Raj Thackeray : “आम्ही गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना 7 जागा देणार होतो. अकोल्यासह सात जागांचा यात समावेश होता. तरीही ते त्यांच्या बाजूला वळले. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि भूमिकेचा अजिबात विचार करत नाहीत”, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. यावेळी संजय राऊतांनी राज ठाकरेंनाही अप्रत्यक्षपणे टोला लगावला.
संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या विचाराबद्दल आणि त्यांच्या पाठिंब्याबद्दल भाष्य केले. “प्रकाश आंबेडकर हे आंबडेकर आहेत. आम्ही आजही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानतो. या देशावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत. प्रकाश आंबेडकरांना जर याचे भान असते तर त्यांनी अशाप्रकारचे वक्तव्य केले नसते. रामदास आठवले, जोगेंद्र कराडे, राजेंद्र गवई हे सर्व आंबेडकरांच्या खरे वारसदार विचारधारेचे शिलेदार आहेत, असं आम्ही म्हणालो तर त्यात काहीही चुकीचं नाही”, असे संजय राऊत म्हणाले.
“गेली अनेक वर्ष रामदास आठवले या महाराष्ट्रात आंबेडकरांचा विचार पुढे नेत आहेत. गेली अनेक वर्ष ते सत्तेत आहेत. त्यांचे सर्वांशीच सलोख्याचे संबंध आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशात ज्या पद्धतीने काम करत होते, त्यापद्धतीनेच आठवले हे काम करत आहेत. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारा, संघटना याचे खरे वारसदार हे रामदास आठवले आहेत, असे म्हणायला हवे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे देशावर मोठे उपकार आहेत”, असेही संजय राऊतांनी यावेळी म्हटले.
“प्रकाश आंबडेकर हे आमच्यासोबत येण्याचा प्रयत्न करत होते. ते महाविकासआघाडीचे घटक होते. लोकसभेत आम्ही त्यांना ७ जागा देणार होतो. अकोल्यासह सात जागांचा यात समावेश होता. तरीही ते त्यांच्या बाजूला वळले, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि भूमिकेचा विचार अजिबात करत नाहीत”, असा धक्कादायक खुलासाही संजय राऊतांनी केला.
“आपल्या भूमिकेमुळे राष्ट्रद्रोही शक्तींना, धर्मांध शक्तींना जर मदत होत असेल, मग ते कोणीही असो. या महाराष्ट्रात दोन असे नेते आहेत, जे अशाप्रकारे हस्तकाचे काम करतात. कधी मोदी-शाहांना पाठिंबा देतात, कधी बेईमान शिंदे गटाला पाठिंबा देतात, हे दोन महाराष्ट्रातील जे नेते आहेत. त्यांच्यावर आता महाराष्ट्राला विचार करण्याची वेळ आली. लोकसभेत यांचं कोणी ऐकलं नाही. पाडापाडी करणं आणि त्या बदल्यात व्यवहार करणं हे यांचं काम आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन या धर्मांध शक्तींना धडा शिकवायला हवा. या हस्तकांनी संपूर्ण देशात उमेदवार उभे करायला हवेत, म्हणजे त्यांना जास्त पैसे मिळतील. महाराष्ट्रात त्यांना कमी पैसे मिळतात. देशात त्यांना जास्त पैसे मिळतील”, असा टोलाही त्यांनी राज ठाकरेंना लगावला.