तुरुंगात मुक्काम, पण राऊतांचं विरोधकांना घाम फोडणारं ‘हे’ काम कधीच थांबलं नाही; किस्सा काय?

संजय राऊत यांच्या "हेल टू हेवन" या पुस्तकाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवली आहे. या पुस्तकात त्यांनी तुरुंगातील अनुभव देखील सांगितले आहेत.

तुरुंगात मुक्काम, पण राऊतांचं विरोधकांना घाम फोडणारं हे काम कधीच थांबलं नाही; किस्सा काय?
Sanjay raut
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: May 17, 2025 | 7:43 PM

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राउत यांच्या ‘हेल टू हेव्हन’ या पुस्तकाने राजकीय वादळ निर्माण केले आहे. या पुस्तकात ईडीच्या कारवाया, सरकारच्या धमक्या, ईडी आणि सीबीआयच्या नोटिसांमुळे विरोधी पक्षातील आमदार आणि खासदारांच्या जीवाला असलेला धोका अशा अनेक गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. आज १७ मे रोजी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. त्यावेळी त्यांनी तरुंगातील अनेक अनुभव सांगितले आहेत.

संजय राऊत म्हणाले, ‘दर दिवशी माझं एडिट रोज बाहेर यायचं. सरकारने चौकशी लावली. माझं रोखठोक येत होतं. मी खूश होतो. कारण माझं काम होत होतं. आतल्या गोष्टी आतच बऱ्या. या कटू आठवणी असल्या तरी माझ्यासारखा माणूस खचत नाही. कारण आम्ही बाळासाहेबांसोबत काम केलं. त्यांनी तिच शिकवण दिली खचू नका. मी कोठडीत होतो आणि सरकारवर टीका करणारं माझं रोखठोक प्रसिद्ध झालं. संजय राऊत तुरुंगात आहेत. पण रोखठोक प्रसिद्ध कसं झाले. दोन अधिकारी आले. त्यांनी रात्री उठवलं. चौकशी सुरू केली. मी राज्यपालांवर लिहिलं होतं. म्हटलं मी आधीच लिहून आलो होतो. म्हटलं मला माहीत होतं ते घाण करणार आहेत. मी म्हटलं तुमच्याकडे सीसीटीव्ही आहे. तुम्ही चेक करा. ‘

‘आम्ही कसाबच्या बॅरकमध्ये राहिलो. ती बॅरक जयंत पाटलांनी केली होती. त्याची डिझाईन त्यांनी बनवली. आणि नंतर आम्हाला आत पाठवलं. नंतर जयंत पाटील म्हणाले, कसा होता बॅरक. मीच बनवला आहे. कटू आठवणी असतातच. त्या कटू म्हणून घ्यायच्या नाही. तो अनुभव म्हणून घ्यायचा. मी उद्धव ठाकरेंना म्हटलं कसं आहे पुस्तक. ते म्हणाले, मी भाषणात सांगतो. ते पुढे म्हणाले, एका वाक्यात सांगतो पुस्तकात रडगाण नाही’ असे संजय राऊत म्हणाले.

काय आहे पुस्तकाचं सार?

या पुस्तकाचं सार काय तर हे पुस्तक राजकीयच आहे. ज्याला विरोधी पक्षात राहायचं आहे, त्याने पुस्तक वाचावं. ज्यांना सत्तेची चाटूगिरी करायची आहे त्याच्यासाठी पुस्तक नाही. एका वाक्यात सांगतो. शेवटचा सार असा आहे, महाराष्ट्र गांडू नाही. महाराष्ट्र मर्दांची औलाद आहे. आमच्यासारखे अनेक लोक आहेत. अनेकांना त्रास झाला. अनिल परबांनाही त्रास झाला. आम्ही झुकलो नाही. आम्ही न्यायाधीशांसमोर आजही जातो. काय करणार? परत अटक करणार. हुकूमशाह किती हुकूमशाही करेल. कधी ना कधी त्यालाही मातीत गाडलं जातं असे ते म्हणाले.

Follow Us