मोदींचा राजयोग संपलाय, 13 वर्षात तुम्ही सत्तेत नसालच मला भविष्य चांगलं कळतंय; संजय राऊत यांनी डिवचले
या भाषणात संजय राऊत यांनी उबाठा संपणार असल्याची टीका करणाऱ्या मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. विखे पाटील यांनी भाजपाच्या लाचारीचे काम चालू ठेवावे, पण शिवसेनेच्या नादी लागू नये असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

शिर्डीत शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा मेळावा आज झाला. या मेळाव्यात शिवसेनेचे अनेक नेते उपस्थित होते. या मेळाव्यात शिवसैनिकांचे धैर्य वाढवणारे घणाघाती भाषण शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले. संजय राऊत यांनी शिवसेना संपवणारे स्वत: संपले आहेत. गेल्या 60 वर्षात छगन भुजबळ, नारायण राणे, एकनाथ शिंदे सगळे आले आणि गेले. एकनाथ शिंदे तर आहे तिथून कायमचे निघून जातील. मात्र शिवसेना आहे तिथेच राहील असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.
संजय राऊत पुढे म्हणाले की आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्षाच्या मंत्र्यांना पाणी पिण्याचे सल्ले देत आहेत. हे पंतप्रधानांचे काम आहे का ? देशाला एक परीक्षा नीट घेता येत नाहीए. एकीकडे हे सांगतात की गो हत्या करू नका आणि दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये सत्ता येताच 15 वर्षांवरील गाय कापण्याची परवानगी देतात आणि हे लोक आम्हाला हिंदुत्व शिकवणार का? हिंदुत्वात आम्ही तुमचे बाप आहोत. मोदी यांचा आता राजयोग संपला आहे. पक्ष फोडायचे, मते विकत घ्यायची हाच याचा मंत्र असल्याची घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.
संजय राऊत पुढे म्हणाले की SIR मुळे भाजपाने पश्चिम बंगालमधली निवडणूक ताब्यात घेतली, जिंकली नाही. नरेंद्र मोदी दिल्लीत भेटतात, पण डोळ्यात डोळे घालण्याची हिंमत होत नाही. अमित शहा, तुम्ही शिवसेनेच्या पाठीत जो खंजीर खुपसला.. एक दिवस तोच खंजीर तुमच्या पाठीत खुपसला जाणार आहे. शिवसैनिक बदला घेतल्याशिवाय राहणार नाहीत अशी टीका त्यांनी यावेळी केली.
हीच बाळासाहेबांची सेना…
शिवसैनिकांनी आता मागे हटायचे नाही. आम्ही सर्व शिवसैनिकांच्या पाठीशी ठाम उभे आहोत. आपल्याला पुढील अडीच तीन वर्षे केवळ पक्ष आणि संघटन बांधायचे आहे. शिवसेनेला पुन्हा गतवैभव मिळवून द्यायचे आहे, ही आपल्या बाळासाहेबांची शिवसेना, मिंध्येची नाही. आपली शिवसेना हीच खरी बाळासाहेबांची शिवसेना आहे. दुसरी अमित शहाची सेना आहे, तेथे उठ म्हटले की उठतात, बस म्हटले की बसतात अशीही टीका यावेळी संजय राऊत यांनी केली.
