जयंत पाटील ‘मुनगंटीवार के हसीन सपने’ पुस्तक लिहितील, त्याची प्रस्तावना मी लिहीन : संजय राऊत

| Updated on: Mar 07, 2020 | 10:53 AM

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अयोध्येत पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Sanjay Raut on Uddhav Thackeray Ayodhya) यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत माहिती दिली.

जयंत पाटील ‘मुनगंटीवार के हसीन सपने’ पुस्तक लिहितील, त्याची प्रस्तावना मी लिहीन : संजय राऊत
Follow us on

अयोध्या : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अयोध्येत पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Sanjay Raut on Uddhav Thackeray Ayodhya) यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत माहिती दिली. “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्या पुन्हा अयोध्येत येत आहेत. रामलल्लाच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला आहे”, असं संजय राऊत म्हणाले. यापूर्वी उद्धव ठाकरे दोनवेळा अयोध्येत आले होते. रामलल्लाच्या कृपेने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे ते उद्या रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी येत आहे.  उद्या साडेतीन वाजता पत्रकार परिषद घेतील. दुपारी 4:30 वाजता रामलल्लाचं दर्शन घेतील. कोरोना व्हायरसमुळे उद्या शरयू आरती होणार नाही.  साडेपाच वाजता उद्धव ठाकरे परत लखनौला जातील, असं संजय राऊत यांनी सांगितलं. (Sanjay Raut on Uddhav Thackeray Ayodhya)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, ‘सामना’च्या संपादक रश्मी ठाकरे आणि राज्याच्या कॅबिनेटचे काही सदस्य उद्या सोबत असतील. अयोध्येत शांतता रहावी, मंदिर निर्माणाचं काम व्हावं, हा त्यामागील उद्देश आहे, असं संजय राऊतांनी नमूद केलं.

फैजाबाद एअरस्ट्रीपचं काम सुरु आहे, म्हणून बाय रोड उद्धव ठाकरे अयोध्येत येणार आहे. त्यांना कोण विरोध करतंय? माझ्याकडे कुणी विरोध घेऊन आलं नाही, सर्व संत स्वागत करत आहेत, असा दावा राऊत यांनी केला.

हा राजकारण करण्याचा कार्यक्रम नाही, धार्मिक कार्यक्रम आहे. सरकार सरकारच्या जागेवर आहे, आस्था आस्थेच्या जागेवर आहे. जम्मू काश्मीरमध्ये भाजपने महबूबा मुफ्ती यांच्यासोबत सरकार बनवलं, तेव्हा अयोध्येत भाजप नेत्यांचा कुणी विरोध केला होता का? असा सवाल करत, संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना अयोध्येत येऊ न देण्याचा इशारा देणाऱ्यांना उत्तर दिलं.

राहुल गांधींनी अयोध्येत यावं – राऊत

राममंदिर सर्वांचं आहे, मंदिर बांधण्याच्या कारसेवक शिवसैनिक येणार. काँग्रेसच्या लोकांनाही अयोध्येत येण्याबाबत बोलणं झालं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुद्धा अयोध्येत यावं, सर्वांनी मंदिर बांधण्याच्या कामात सहकार्य करावं, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं राममंदिर ट्रस्ट निर्माण झाला आहे. न्यायालयाच्या निर्णयानं पुढे जाणार आहे, असं राऊत म्हणाले.

महात्मा गांधी यांनी रामराज्याची भूमिका मांडली. जे विरोध करत आहेत, त्यांनी हिंदुत्वाची व्याख्या पाहावी, असा टोला संजय राऊतांनी लगावला.

शरयू आरती होणार नाही, त्यामुळे कमी लोकं येतील. महाराष्ट्रातून 2 हजार लोक येतील. राममंदिर निर्माण कार्यासाठी उद्या उद्धव ठाकरे मदतीची घोषणा करणार आहेत, असंही राऊतांनी सांगितलं.

मुनगंटीवार के हसीन सपने

संजय राऊत यांनी यावेळी भाजपवर निशाणा साधला. हे सरकार पाच वर्षे टीकेल, पुढील 15 वर्षे महाविकास आघाडीचं सरकार राहील. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे ‘मुनगंटीवार के हसीन सपने’ हे पुस्तक लिहितील आणि त्याची प्रस्तावना मी लिहीन, असा टोला संजय राऊतांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांना लगावला. तसंच पुढील 30 वर्षे मी ‘सामना’चा संपादक राहणार आहे, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या  

ग्राऊंड रिपोर्ट – अयोध्या : ‘बालासाहब का बेटा आ रहा हैं’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा, शिवसेेनेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन