पवार-शहांची भेट झाली तर चूक काय?; संजय राऊतांची सावध प्रतिक्रिया

| Updated on: Mar 29, 2021 | 10:42 AM

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजपचे नेते अमित शहा यांच्यात झालेल्या भेटीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. (sanjay raut reaction on amit shah and sharad pawar meeting)

पवार-शहांची भेट झाली तर चूक काय?; संजय राऊतांची सावध प्रतिक्रिया
sanjay raut amit shah sharad pawar
Follow us on

मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजपचे नेते अमित शहा यांच्यात झालेल्या भेटीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. भेट झाली तर होऊ दे. कामानिमित्त भेट झाली तर चूक काय?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. (sanjay raut reaction on amit shah and sharad pawar meeting)

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला. पवार-शहांची भेट झाली असेल तर होऊ दे. बंद खोलीतील मुद्दे बाहेर येतात. कामानिमित्त दोन नेत्यांची भेट झाली असेल तर होऊ द्या, असं राऊत यांनी सांगितलं. या भेटीत सस्पेन्स असं काय आहे. दोन नेत्यांनी भेटणं वावगं काय? गृहमंत्र्यांकडे पवारांचं काही काम असू शकतं, असंही ते म्हणाले.

विरोधकांना संधी देऊ नका

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे. त्यामुळे सरकारमध्ये मिठाचा खडा पडला आहे का? असा सवालही त्यांना केला. त्यावर अजित पवारच बोललेत ना… बोलू द्या. राजकारण हालतडुलत राहिलं पाहिजे. लोकशाही आहे. लोकशाही जिवंत राहिली पाहिजे. एकमेकांवर टीका झाली पाहिजे, त्यात गंमत असते, असं सांगतानाच विरोधकांना वातावरण निर्माण करण्यासाठी संधी देऊ नका, असा सल्लाही त्यांनी सत्ताधारी पक्षांना दिला. महाविकास आघाडी खंबीर आहे. आघाडीला धोका नाही. हे जनतेने निवडून दिलेलं सरकार आहे आणि पाच वर्ष पूर्ण करेल. या सरकारकडे बहुमत आहे, असंही ते म्हणाले.

विरोधक बेरंग

यावेळी त्यांनी रंगपंचमीच्या निमित्ताने विरोधकांवरही शब्दांच्या रंगांची उधळण केली. विरोधकांना कोणताच रंग नाही. रंग असता तर त्यांनी चांगले रंग उधळले असते. पण विरोधक बेरंग आहेत. म्हणून त्यांनी आमच्यासोबत प्रेमाचे रंग उधळावेत. ऊठसूठ रंग उधळू नयेत. महाराष्ट्राच्या तंगड्यात तंगड्या गुंतवू नयेत. रंग खेळण्यास निर्बंध घालण्यात आलेले आहेत. त्यामुळे विरोधकांनी शांत राहावं, असा टोलाही त्यांनी लगावला.

मुख्यमंत्र्यांशी चर्चा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी काल भेटलो. त्यांच्याशी नेहमी भेट होते. ते केवळ मुख्यमंत्री नाहीत तर आमचे पक्षप्रमुख आहेत. त्यामुळे त्यांच्याशी भेट झाल्यावर देशापासून राज्याच्या राजकारणावर चर्चा होतेच. कालही त्यांच्याशी राजकारणावर चर्चा झाली, असंही त्यांनी सांगितलं.

कोणावरही निशाणा नाही

यावेळी त्यांनी ‘सामना’तून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेविषयी भाष्य केले. यामध्ये कोणावरही निशाणा साधायचा प्रश्नच येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही एका वृत्तपत्राला मुलाखत देताना ही बाब मान्य केली. अलीकडच्या काळातील राज्यातील घटनांमुळे महाराष्ट्राचं नाव राष्ट्रीय स्तरावर बदनाम झालं आहे. सामाजिक, राजकीय आणि सर्वच क्षेत्रांमध्ये राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राची एक प्रतिष्ठा आहे. ही प्रतिष्ठा या सगळ्या घटनांमुळे डागाळल्याचे राऊत यांनी सांगितले. (sanjay raut reaction on amit shah and sharad pawar meeting)

 

संबंधित बातम्या:

बाप रे! देशातील 10 टक्के कोरोना रुग्ण एकट्या मुंबईत; काँग्रेस नेत्याची मोदी आणि उद्धव ठाकरेंना एकत्र येण्याची विनंती

LIVE | कामानिमित्त भेटल्यास चुकीचं काय? अमित शाह- शरद पवारांंच्या भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

महाविकासआघाडीत मीठाचा खडा टाकू नका; संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर अजित पवारांचा इशारा

(sanjay raut reaction on amit shah and sharad pawar meeting)