भाजपला महाराष्ट्राच्या स्थिरतेला चूड लावायचीय, कामगारांनी राजकारण्यांच्या हातचे बाहुले बनू नका; राऊत यांचं आवाहन

| Updated on: Nov 11, 2021 | 11:06 AM

भाजपला महाराष्ट्राच्या स्थिरतेला आणि शांततेला चूड लावायची आहे. त्यांना राजकारणाच्या पोळ्या भाजायच्या आहेत. त्यामुळे एसटी कामगारांनी भाजपच्या हातचे बाहुले बनू नका. (sanjay raut slams bjp over MSRTC Employees strike)

भाजपला महाराष्ट्राच्या स्थिरतेला चूड लावायचीय, कामगारांनी राजकारण्यांच्या हातचे बाहुले बनू नका; राऊत यांचं आवाहन
sanjay raut
Follow us on

नवी दिल्ली: भाजपला महाराष्ट्राच्या स्थिरतेला आणि शांततेला चूड लावायची आहे. त्यांना राजकारणाच्या पोळ्या भाजायच्या आहेत. त्यामुळे एसटी कामगारांनी भाजपच्या हातचे बाहुले बनू नका, असं आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं.

संजय राऊत यांनी एसटी कामगारांच्या आंदोलनावरून भाजपवर जोरदार हल्ला केला. महाराष्ट्र सरकारने कामगारांच्या बऱ्याचश्या मागण्या मान्य केल्या आहेत. कामगारांनी राजकीय पोळ्या शेकणाऱ्यांच्या हातातील बाहुले बनू नये. त्यांनी स्वत:चं, कुटुंबाचं, एसटीचं आणि महाराष्ट्राचं हित पाहावं, असं आवाहन हे मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. आजचे मुख्यमंत्री हे विश्वास ठेवावेत असे आहेत. त्यामुळे कामगारांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा, असं आवाहन राऊत यांनी केलं.

पुतळे जाळण्यामागे राजकारण

अनिल परब यांचे पुतळे जाळण्यात येत आहेत. त्यामागे राजकारण आहे. पुतळे जाळण्याचं राजकारण सुरू आहे. ते कोण आहेत? त्यांचा राजकीय अजेंडा काय आहे? त्यांना कामगारांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा सरकारला बदनाम करण्यात रस आहे. कामगारांच्या चुली पेटाव्यात असं त्यांना वाटत नाही. एसटी विलीनकरण करावे अशी त्यांची मागणी आहे. पण एसटीचं विलीनिकरण होणं अजिबात शक्य नाही असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवारच म्हणाले. त्यांचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ अर्धवट नाही. पूर्ण आहे. पण त्यांची भूमिका तीच आहे. आता मात्र, भाजपमधील हौशेगवशे, उपरे नाचत आहेत. त्यांच्या नाचण्याने प्रश्न सुटत असतील तर सुटावेत, असा चिमटाही त्यांनी काढला.

त्यांनी कामगारांच्या घराच्या होळ्या करायचं ठरवलंय

कोरोनामुळे देशाची आर्थिक घडी विस्कटली गेलेली आहे. सध्या देशाची स्थिती कठिण आहे. भाजपला महाराष्ट्राच्या स्थिरतेला चूड लावायची आहे. महाराष्ट्राच्या शांततेतेला चूड लावायची आहे. त्यासाठी त्यांनी कामगारांच्या घराच्या होळ्या करायचं ठरवलं असेल तर कामगारांनी त्यातून बाहेर पडलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

मुख्यमंत्री लवकरच बरे होतील

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतल्या रिलायन्सच्या हरकिशनदास हॉस्पिटलात दाखल झाले आहेत. त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांचं पथक उपचार करत आहे. लवकरच ते बरे होतील. पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सेवेत रूजू होतील. फार चिंता करावी असं नाही. मानेचं थोडंफार दुखणं आहे. ते पूर्ण होऊन दोनेक दिवसात येतील, असं त्यांनी सांगितलं.

 

संबंधित बातम्या:

VIDEO: मच्छर आणि थंडीचा मारा सोसत पडळकर, खोत रात्रभर आझाद मैदानात; एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरूच

सातारा जिल्हा बँकेत राष्ट्रवादी पुरस्कृत सर्वसमावेशक पॅनेलचा वरचष्मा, उदयनराजे भोसले, रामराजे निंबाळकर यांच्यासह 11 संचालक बिनविरोध

औरंगाबादः विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून संजय केणेकरांना उमेदवारी, 29 नोव्हेंबर रोजी होणार मतदान

(sanjay raut slams bjp over MSRTC Employees strike)