ना जयंत पाटील, ना वळसे पाटील, पवारांकडून गृहमंत्रिपदी ‘यांची’ निवड

| Updated on: Jan 03, 2020 | 8:53 AM

शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या नावावर गृहमंत्रिपदासाठी शिक्कामोर्तब केल्याचं म्हटलं जात आहे

ना जयंत पाटील, ना वळसे पाटील, पवारांकडून गृहमंत्रिपदी यांची निवड
Follow us on

मुंबई : खातेवाटपात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेले गृहमंत्रिपद विस्तारानंतर राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता बळावली आहे. गृहमंत्रिपद नको म्हणणारे जास्त असल्याचं सूतोवाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्यानंतर गृहमंत्रिपदी कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. त्यातच आता दिग्गज नेत्यांना मागे सारत मंत्री अनिल देशमुख यांचं नाव समोर (Sharad Pawar chooses Home Minister) आलं आहे.

जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यासारख्या तगड्या नेत्यांची नावं गृहमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर मानली जात होती. मात्र शरद पवार यांनी अनिल देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचं म्हटलं जात आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ वृत्तपत्रातून यासंदर्भात बातमी देण्यात आली आहे.

जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील यांनी गृह मंत्रालयाची जबाबदारी घेण्यास नकार दिल्यामुळे अनिल देशमुखांकडे ही धुरा सोपवली जाण्याची चिन्हं आहेत. विदर्भात भाजपचा गड ढासळत असताना महाविकास आघाडीची ताकद वाढवण्यासाठी शरद पवारांनी ही खेळी (Sharad Pawar chooses Home Minister) केल्याचं म्हटलं जातं.

कोण आहेत अनिल देशमुख?

अनिल देशमुख हा राष्ट्रवादीचा विदर्भातील प्रमुख चेहरा आहे. नागपुरातील काटोल मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून आले आहेत. अनिल देशमुख यांनी नागपूर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद सांभाळत राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. 1995 मध्ये काटोल मतदारसंघातून ते सर्वप्रथम अपक्ष आमदार म्हणून विधानसभेवर निवडून आले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.

अनिल देशमुख 2014 पर्यंत सलग चार वेळा विधानसभेवर निवडून आले. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यावेळी भाजपच्या तिकीटावर लढलेला त्यांचा पुतण्या आशिष देशमुख यांनी काकांचा पराभव केला. 2019 मध्ये पुन्हा त्यांनी आपला मतदारसंघ काबीज केला.

आघाडी सरकारच्या काळात अनिल देशमुख यांनी शालेय शिक्षण, माहिती आणि जनसंपर्क, क्रीडा आणि युवा कल्याण मंत्रालयाचं राज्यमंत्रिपद भूषवलं होतं. त्यानंतर, देशमुखांना कॅबिनेट मंत्रिपदी बढती मिळाली. त्यांनी आतापर्यंत उत्पादन शुल्क, अन्न आणि औषधे (2001 ते 2004), सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) (2004 ते 2008) अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण (2009 ते 2014) या विभागाचं कॅबिनेट मंत्रिपद सांभाळलं आहे.

खातेवाटपाचा मुहूर्त कधी?

खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्याचं म्हटलं जात आहे. मात्र ते जाहीर करण्यास विलंब होताना दिसतो. आज (शुक्रवारी) खातेवाटपाची घोषणा होईल, अशी माहिती आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आधी गुरुवार संध्याकाळचा मुहूर्त सांगितला होता. मात्र ही घटिका काही केल्या समीप येताना दिसत नाही.

हेही वाचा : भाजपच्या गडात ठाकरे सरकारचे अष्टप्रधान!

30 डिसेंबरला महाविकास आघाडीचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. 26 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्र्यांनी यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर लगेचच खातेवाटपाबाबत तर्कवितर्क लढवले जाऊ लागले. मात्र घोषणेसाठी तीन पक्षांच्या सरकारला तीन तारखेचा मुहूर्त मिळणार का, हे पाहणं उत्सुकतेचं (Sharad Pawar chooses Home Minister) आहे.