Chagan Bhujbal : शिवसेना ही तिखटच, भुजबळांनी सांगितला पक्ष सोडल्यांनतरचा स्वत:चा अनुभव…!
महाराष्ट्रातून मी पहिला व्यक्ती होतो ज्यावर ईडीने कारवाई केली होती. त्यावेळी तर ईडी बाबत काहीच माहिती नव्हती. आता मात्र, ईडीचा प्रयोग हा देशभर वाढला आहे. पाएमएलए मध्ये तर एक वर्ष जामिनही मिळत नाही. तर यामध्ये आपली बाजूही मांडता येत नसल्याचे भुजबळ यांनी सांगितले आहे. माझ्या कारवाई दरम्यान तर सोन्याच्या आणि हिऱ्यांच्या गोण्या सापडल्याच्या वावड्या उठल्या होत्या.
मुंबई : (Shiv sena Party) शिवसेनेतून बंड केल्यानंतर स्वतंत्र गटाची स्थापना करणाऱ्या शिंदे गटातील आमदारावर मंगळवारी शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. (Uday Samant) आ. उदय सामंत हे पुण्यातील तानाजी सावंत यांच्या घराकडे जात असताना शिवसैानिकांनी त्यांच्या गाडीला घेराव घातला आणि काचही फोडली. त्यानंतर शिंदे गटातील आमदारांनी या घटनेचा निषेध केला तर विरोधकांनी हीच खरी शिवसेना असल्याचे सांगत गद्दारांबद्दल असेच होणार हे ठणकावून सांगितले आहे. मात्र, चर्चा रंगली आहे ती कधीकाळी शिवसेनेत असलेल्या (Chagan Bhujbal) छगन भुजबळ यांच्या प्रतिक्रियेची. शिवसेना ही आधीपासूनच तिखट आहे. मी देखील पक्ष सोडला तेव्हा माझी गाडीही शिवसैनिकांनी फोडली होती असे खुद्द भुजबळांनीच सांगितले आहे. त्यामुळे शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत अनेकांना पक्ष सोडला असला तरी शिवसैनिक हे पक्षाबरोबरच असल्याचे हे प्रतिक असेही भुजबळ म्हणाले आहेत.
मंत्रिमंडळ विस्तारावरही खोचक टिका
शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार सत्तेत येऊन महिना उलटला तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. यावरुन अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सध्या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून प्रत्येक खात्याला मंत्रि असता तर त्याचा आढावा घेऊन मदत करताना त्याचा उपयोग झाला असता पण मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. मात्र, भुजबळ यांनी सरकारला खोचक टोला लगावला आहे. मंत्रिमंडळ विस्तार याबाबत आम्ही त्यांना कसं विचारणार. जर दोघांनी प्रश्न सोडवले तरी बस झालं असे म्हणत कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
‘ईडी’च्या कारवाईमध्ये बाजू मांडता येत नाही
महाराष्ट्रातून मी पहिला व्यक्ती होतो ज्यावर ईडीने कारवाई केली होती. त्यावेळी तर ईडी बाबत काहीच माहिती नव्हती. आता मात्र, ईडीचा प्रयोग हा देशभर वाढला आहे. पाएमएलए मध्ये तर एक वर्ष जामिनही मिळत नाही. तर यामध्ये आपली बाजूही मांडता येत नसल्याचे भुजबळ यांनी सांगितले आहे. माझ्या कारवाई दरम्यान तर सोन्याच्या आणि हिऱ्यांच्या गोण्या सापडल्याच्या वावड्या उठल्या होत्या. पुढे काय झाले ते महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळे ही एक केंद्रीय संस्था असली तरी येथे आपली बाजू मांडता येत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
कोर्टाच्या निर्णयावरच सर्वकाही
12 आमदारांवर कारवाई करावी अशी याचिका कोर्टात दाखल करण्यात आली आहे. यावरील पहिल्या दिवसाची सुनावणी पार पडली असली तरी ही प्रक्रिया किचकट झालेली आहे. त्याबाबत कुणालाच काही सांगता येणार नाही. मात्र, शरद यादव यांच्याबाबत एक वक्तंव्य केल्याने खासदारकी रद्द करण्यात आल्याचा हवाला देण्यात आला होता. तर सभागृहात व्हीपचे उल्लंघन करता येत नाही तर तो अवैध ठरु शकता. अशा अनेक बाबीयामध्ये आहेत. त्यामुळे कोर्टाच्या निर्णयाबाबत ते ही आशावादी आणि महाविकास आघाडीही आशावादी असल्याचे भुजबळ यांनी सांगितले आहे.