Shiv Sena : शिवसेना संपवू पाहणाऱ्यांच्या गोवऱ्या सोनापुरात रचल्या जातील, शिवसेनेचा हल्लाबोल

Shiv Sena : मुख्यमंत्र्यांचे हे विधान समर्थक आमदारांनी मनावर घेतले तर शिंदेशाही खऱ्या अर्थाने औटघटकेची ठरेल. काही क्षणात त्यांचा तंबू रिकामा होईल. कारण 'गाव का बच्चा बच्चा जानता है' की, शिंदे गटातील निम्मे लोक ईडीला घाबरूनच विश्वासघाताच्या मार्गाने गेले.

Shiv Sena : शिवसेना संपवू पाहणाऱ्यांच्या गोवऱ्या सोनापुरात रचल्या जातील, शिवसेनेचा हल्लाबोल
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 03, 2022 | 7:05 AM

मुंबई: भाजपच्या (bjp) मनात बऱ्याच काळापासून शिवसेना संपवण्याचा डाव होता. तो डाव तडीस जात नव्हता. शेवटी शिंदे व त्यांच्या समर्थकांवर ईडी (ed) वगैरेची तलवार लावून त्यांनी शिवसेना संपविण्याचा डाव टाकलाच. पण आता तोही डाव उलटताना दिसत आहे. शिवसेना नवी उभारी घेत आहे. ती वेगाने आकाशाला गवसणी घालेल व शिवसेना (shivsena) संपवू पाहणाऱ्यांच्या गोवऱ्या सोनापुरात रचल्या जातील याविषयी आमच्या मनात तरी शंका नाही, असं सांगतानाच ‘ईडी’ला घाबरून आमच्याकडे किंवा भाजपकडे येऊ नका असे सांगणे म्हणजे दोघांचेही दुकान कायमचे बंद करण्यासारखे आहे. कारण चोरीच्या मालावर सुरू केलेले दुकान फार काळ चालत नाही, असा टोला शिवसेनेने शिंदे गटाल लावला आहे. दैनिक ‘सामना’तील अग्रलेखातून शिंदे गटावर जोरदार टीका करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री म्हणतात, ”ईडीला घाबरून कुणी आमच्याकडे येऊ नका.” मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले की, ”राज्यात आम्ही नवे सरकार बनवले आहे. एवढे आमदार, एवढे खासदार आमच्याकडे आले, त्यातील कोणीही ईडी किंवा इतर तपास यंत्रणांच्या कारवायांना घाबरून आमच्याकडे आलेले नाही. माझी विनंती आहे की, ईडीच्या कारवाईला घाबरून कोणीही आमच्याकडे येऊ नका. तसेच भाजपकडेही जाऊ नका.” मुख्यमंत्र्यांना 40 आमदारांचे समर्थन आहे. मुख्यमंत्र्यांचे हे विधान समर्थक आमदारांनी मनावर घेतले तर शिंदेशाही खऱ्या अर्थाने औटघटकेची ठरेल. काही क्षणात त्यांचा तंबू रिकामा होईल. कारण ‘गाव का बच्चा बच्चा जानता है’ की, शिंदे गटातील निम्मे लोक ईडीला घाबरूनच विश्वासघाताच्या मार्गाने गेले. स्वतः शिंदे यांची तीच कहाणी आहे, असंही शिवसेनेने म्हटलं आहे.

अग्रलेखातून हल्लाबोल

  1. शिंदे गटाचा काळ किती कठीण आला आहे हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर स्पष्ट होईल. ‘ईडी’च्या भीतीनेच लोक सैरावैरा पळू लागले व त्याच भयग्रस्त अवस्थेत ते शिंदे यांच्या गलबतात चढले. ते गलबतही आता भरकटले आहे. त्यांच्या विचारांना दिशा नाही व कृतीला कर्तृत्वाची जोड नाही.
  2. सिल्लोडची भूमी त्यांनी क्रांतीची ठिणगी टाकण्यासाठी निवडली, पण सिल्लोडचे समर्थक आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर विश्वास ठेवणारे बाराच्याच भावात जातात. सत्तार यांनी बाराच्या भावात घालण्यासाठी या वेळी मुख्यमंत्र्यांचीच निवड केली हे कौतुकास्पद आहे.
  3. शिंदे यांनी राष्ट्रवादीचा डाव हाणून पाडला हे विधान तर्कसंगत नाही. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्रीपद शिंदे यांना मिळाले असते तर राष्ट्रवादीचे गुणगाण करताना हे महाशय दिसले असते. शिंदे यांना येनकेन मार्गाने मुख्यमंत्रीपद हडपायचे होते. भाजप-ईडी युतीने त्यांना त्याकामी ‘समृद्धीचा मार्ग’ दाखवला. तेव्हा राष्ट्रवादीचा डाव हाणून पाडला वगैरे सगळी बकवास आहे.
  4. शिवसेना संपविण्याचा राष्ट्रवादीचा डाव त्यांनी हाणून पाडला. मग महाराष्ट्राच्या बदनामीचा, मराठी माणसाला खतम करण्याचा, महाराष्ट्रातील हिंदू समाजात फूट पाडण्याचा राज्यपाली डाव शिंदे का बरे हाणून पाडू शकले नाहीत? मी मुलाखत दिली तर भूकंप होईल, असा टोला त्यांनी मारला. मग त्यांना कोणी अडवले आहे?