शिवसेना-भाजप युतीची पत्रकाद्वारे घोषणा, फॉर्म्युला गुलदस्त्यात

| Updated on: Sep 30, 2019 | 8:28 PM

अखेर शिवसेना-भाजप युतीच्या (Shivsena BJP Alliance) निर्णयावर शिक्कामोर्तब झाला आहे.

शिवसेना-भाजप युतीची पत्रकाद्वारे घोषणा, फॉर्म्युला गुलदस्त्यात
Follow us on

मुंबई: अखेर शिवसेना-भाजप युतीच्या (Shivsena BJP Alliance) निर्णयावर शिक्कामोर्तब झाला आहे.  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election) महायुती होणार असल्याच्या निर्णयाबाबत एक पत्र प्रकाशित करुन माहिती देण्यात आली आहे. यात भारतीय रिपब्लिकन पक्ष (RPI), राष्ट्रीय समाज पक्ष (RSP), शिवसंग्राम (Shivsangram) आणि रयतक्रांती (Rayatkranti) या पक्षांचाही समावेश आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि शिवसेनेचे नेते सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्या नेतृत्वात युतीची घोषणा करणारे प्रसिद्धी पत्रक काढण्यात आले. विशेष म्हणजे पहिल्यांदाच पत्रकार परिषदेऐवजी शिवसेना-भाजपने पत्रकाद्वारे युतीची घोषणा केली. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नागपूर येथील पत्रकार परिषदेत युतीचा निर्णय झाल्याचं सांगितलं.

शिवसेनेच्या 50-50 च्या फॉर्म्युल्याचं काय होणार?

युतीची घोषणा झालेली असली तरी भाजप आणि शिवसेना यांच्यातील जागावाटपाचा तिढा अद्याप कायम असल्याचं चित्र आहे. लवकरच युतीचा फॉर्म्युला (BJP Shivsena seat sharing formula) जाहीर करु असंही सांगण्यात आलं आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी तातडीने शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. शिवसेना आधीपासून 50-50 च्या फॉर्म्युल्याप्रमाणे जागांची मागणी करत आहे. मात्र भाजपची याला तयारी नसल्याचं दिसत आहे.

मागील काही काळात भाजपमध्ये आयारामांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे भाजपसमोर पक्षातील इच्छुक आणि आयाराम यापैकी कुणाला उमेदवारी द्यायची हा मोठा पेच तयार झाला आहे. त्यामुळेच भाजप शिवसेनेकडे अधिक जागांची मागणी करत 50-50 च्या फॉर्म्युल्याला नकार देत असल्याचं बोललं जात आहे.

भाजप आणि शिवसेना यांच्या जागावाटपाचा फॉर्म्युला (BJP Shivsena seat sharing formula) ठरला असून त्याची केवळ अधिकृत घोषणाच बाकी असल्याचं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. त्यानंतर आता शिवसेनेने देखील बैठक बोलावल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Maharashtra Assembly Election) सोमवारचा (30 सप्टेंबर) दिवस शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जात आहे. आदित्य ठाकरेंनी वरळी (Aditya Thackeray from Worli) येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात वरळीतून विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांची तातडीची बैठक (Shivsena Important meeting) बोलावली आहे. यात जागावाटपावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.