हाथरस, बलरामपूरप्रकरणात हिंदुत्वाचा शंखनाद थंड का पडला?, शिवसेनेचा भाजपला सवाल

| Updated on: Oct 03, 2020 | 7:59 AM

हाथरस, बलरामपूर प्रकरणात हिंदुत्वाचा शंखनाद थंड का पडला आहे?," असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे. (Shivsena Criticizes BJP On UP Gangrape Case)

हाथरस, बलरामपूरप्रकरणात हिंदुत्वाचा शंखनाद थंड का पडला?, शिवसेनेचा भाजपला सवाल
Follow us on

मुंबई : “महाराष्ट्रातील पालघरमध्ये दोन साधू पुरुषांची जमावाने हत्या केली तेव्हा वेदनेने तळमळणाऱ्या योगींचे विधाने आम्ही पाहिली आहे. संपूर्ण भाजप तेव्हा हिंदुत्वाच्या नावाने शंख फुकत होता. मग हाथरस, बलरामपूर प्रकरणात हा हिंदुत्वाचा शंखनाद थंड का पडला आहे?,” असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे. उत्तरप्रदेशात झालेल्या बलात्काराच्या घटनेवरुन शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजप सरकारवर टीका करण्यात आली.  (Shivsena Criticizes BJP On UP Gangrape Case)

“महाराष्ट्रातील पालघरमध्ये दोन साधू पुरुषांची जमावाने हत्या केली तेव्हा वेदनेने तळमळणाऱ्या योगींचे विधाने आम्ही पाहिली आहे. संपूर्ण भाजप तेव्हा हिंदुत्वाच्या नावाने शंख फुकत होता. मग हाथरस, बलरामपूर प्रकरणात हा हिंदुत्वाचा शंखनाद थंड का पडला आहे? मुंबईत एका नटीचे बेकायदा बांधकाम कायद्याने तोडले म्हणून कर्कश मीडियाचे अँकर्सही आज तोंडात बोळे कोंबून बसले आहेत,” अशी टीका शिवसेनेनं केली.

“देश इतका निर्जीव, हतबल कधीच झाला नव्हता. चारशे-पाचशे वर्षांपूर्वीची बाबरी पाडली म्हणून पेटलेला हा देश एका मुलीच्या देहाची विटंबना होऊनही थंड पडला असेल तर या देशाने सत्त्व गमावले आहे. समाज नपुंसक बनला आहे आणि मतदार गुलाम झाला आहे. हाथरसच्या मातीत राख होऊन हुंदके देणाऱ्या ए अबले, आम्हाला माफ कर!” असेही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

“उत्तरप्रदेशात कायदा -सुव्यवस्थेच्या बाबतीत ‘जंगलराज” 

“उत्तर प्रदेशातील अयोध्येत राममंदिराची पायाभरणी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाली. पण उत्तर प्रदेशात रामराज्य वैगरे नसून कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत जंगलराज आहे. महिलांवरील अत्याचार सुरुच आहेत. पण तरुणींवर बलात्कार आणि खून करण्याच्या घटना योगींच्या राज्यात वाढल्या आहेत. हाथरसमध्ये १९ वर्षाच्या तरुणीवर बलात्कार आणि नंतर खून झाला. त्यानंतर देशात गदारोळ उडाला आहे.”

“मरणाच्या दारात असताना तिने बलात्कार झाल्याचे सांगितले. आता उत्तर प्रदेशातील सरकार म्हणते बलात्कर वैगरे सगळे झूठ आहे. पाठोपाठ बलरामपूरमध्येही सामूहिक बलात्काराचे प्रकरण झाले. पण ना दिल्लीतील अश्रूंचा बांध फुटला ना योगी सरकारच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. बलात्कार झालाच नाही तर विरोधकांनी बोंबलायचे कशाला असे सरकारच बोंबलत आहे. बलात्कार झालाच नाही, तर रात्रीच्या अंधारात त्या तरुणीचा मृतदेह पोलिसांनी पेट्रोल ओतून का जाळला? पीडित मुलीच्या कुटुंबियांना भेटायला निघालेल्या राहुल गांधी यांना अडवलेच, पण त्यांना कॉलर पकडून धक्काबुक्की केली, जमिनीवर पाडले. देशातील एका प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यास असे वागवणे, अपमानित करणे हे लोकशाहीवर ‘गँगरेप’ होत असल्याचे लक्षण आहे,” अशी टीकाही शिवसेनेनं केली आहे. (Shivsena Criticizes BJP On UP Gangrape Case)

संबंधित बातम्या : 

पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करून जबाबदारी झटकू नका, योगीजी, राजीनामा द्या: प्रियांका गांधी

योगीजी, मी तुमच्यापेक्षा वरिष्ठ, माझं ऐका, पीडितांना भेटू द्या : उमा भारती