नारायण राणे मंत्रिपदाचा उपयोग समाजात अशांती आणि विध्वंस पसरवण्यासाठी करतायत, केसरकरांचे बोचरे वार

नारायण राणे आपल्या मंत्रिपदाचा उपयोग समाजात अशांती आणि विध्वंस पसरवण्यासाठी करतायत, अशी घणाघाती टीका शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी केलीय.

नारायण राणे मंत्रिपदाचा उपयोग समाजात अशांती आणि विध्वंस पसरवण्यासाठी करतायत, केसरकरांचे बोचरे वार
दिपक केसरकर आणि नारायण राणे
| Edited By: | Updated on: Aug 29, 2021 | 2:35 PM

सिंधुदुर्ग : नारायण राणे आपल्या मंत्रिपदाचा उपयोग समाजात अशांती आणि विध्वंस पसरवण्यासाठी करतायत, अशी घणाघाती टीका शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी केलीय. सामाजिक अशांतता निर्माण करायची भूमिका हे योग्य आहे का याचा विचार त्यांनी तर केलाच पाहिजे, परंतु महाराष्ट्राच्या जनतेनेदेखील केला पाहिजे, असं केसरकर म्हणाले

नारायण राणे अशांतता निर्माण करतायत

आपल्या मंत्र्यांचे स्वागत करणं ही संस्कृती आहे. माञ विद्वेष पसरवायचा आणि आपल्या मंत्री पदाचा दुरुपयोग करायचा असं वर्तन सध्या राणेंचं आहे. मोदीजींनी मंत्रिमंडळात संधी दिली, मंत्रिपद दिलं ते लोकांच्या सेवेसाठी, त्यांच्या विकासासाठी मात्र ते न करता राणे सामाजिक अशांतता निर्माण करतायत, असं केसरकर म्हणाले.

राणेंनी पुन्हा पुन्हा कुंडलीची भाषा करु नये, कुंडल्या आमच्याकडेही आहेत

राणे जे बोलतात ती महाराष्ट्राची संस्कृती नाही. राणेंनी कुंडली वगैरे काढण्याची भाषा करु नये ते ज्योतिषाचं काम आहे. आमच्याकडेही कुंडल्या आहेत. पण हेच करत बसायचं का? लोकांना विकास महत्त्वाचा आहे, ही असली थेरं नको, असं केसरकर म्हणाले.

तुम्ही फक्त विद्वेषाचं बाळकडू पुढच्या पिढीला देणार आहे का?

मात्र तुम्ही जेव्हा स्वतःच्या मातृभूमीमध्ये येता तेव्हा लोकांसाठी काय देता हे महत्त्वाचं असतं. तुम्ही फक्त विद्वेषाचं बाळकडू पुढच्या पिढीला देणार आहे का? आणि कोकणी संस्कृती नष्ट करणार आहात का?, असा सवालही केसरकरांनी राणेंना विचारला.

विकासाचे मुद्दे घेऊन लोकांसमोर जा

मोदी साहेबांनी तुम्हाला मंत्री केलं. ते नेहमी पॉझिटिव्ह कार्यक्रम देतात… लोकांच्या विकासाचे कार्यक्रम देतात… मग हे विकासाचे कार्यक्रम घेऊन तुम्ही लोकांच्या समोर जाणार की तुम्ही महाराष्ट्रात अशांती पसरवणार, कोकण पेटवणार याचा निर्णय झाला पाहिजे, असंही केसरकर म्हणाले.

तर कोर्टाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल

राणेंवर 17 तारखेपर्यंत हायकोर्टाची बंधन आहेत आणि ते असेच बोलत राहिले तर कदाचित त्यांच्या विरोधामध्ये कोर्टाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल आणि कोर्टाने याची नोंद घेतली पाहिजे. दंगली उसळतील असं कोणतही विधान राणेंनी करता नये हे कोर्टाला अपेक्षित आहे, असंही केसरकर म्हणाले.

नाहीतर राणेंविरोधात तीव्र लढा द्यावा लागेल

मला राणेंवर टीका करायची नाही मात्र कोर्टाने दिलेल्या आदेशाचं त्यांनी पालन करावं आणि आणि कोकणात शांती कशी नांदेल, हे त्यांनी पाहावं, नाहीतर त्यांच्याविरोधात आम्हाला पुन्हा लढा उभारावा लागेल, असा इशाराही त्यांनी राणेंना दिला.

(Shivsena Dipak Kesarkar Attacked Narayan Rane jan Ashirvad yatra)

हे ही वाचा :

20 वर्षानंतर गुलाबराव पाटील पहिल्यांदाच एकनाथ खडसेंच्या घरी; भेटीनंतर केलं मोठं विधान!

जन आशीर्वाद यात्रेमुळे कोरोना वाढणार, अजितदादांचा दावा; केंद्र सरकारवरही टीका