मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या ( Kirit Somaiya) यांच्याकडून शिवसेना (Shivsena) आणि ठाकरे कुटुंबावर होत असलेल्या सततच्या आरोपांविरोधात शिवसनेने दंड थोपटले आहेत. शिवसेनेने सोमय्या यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्यासाठी चाचापणी सुरु केली आहे. सोमय्या यांनी सातत्याने चालवलेल्या आरोपांच्या मालिकेमुळे ठाकरे कुटुंबाच्या प्रतिमेला तडा जात असल्यामुळे शिवसेना ही कारवाई करणार असल्याचे सांगितले जात आहे. ही माहिती शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याने दिलीय. (Shivsena is thinking to file defamation case against BJP leader Kirit Somaiya)
मागील काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या हे शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीयांवर अनेक गंभीर आरोप करत आहेत. त्यांच्या या आरोपांमुळे शिवसेना तसेच ठाकरे कुटुंबाच्या प्रतिमेला तडा जातोय, असे शिवसेनेला वाटत आहे. त्यामुळे यापुढेही सोमय्या हे शांत होणार नाहीत असे गृहीत धरत शिवसेनेने त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे ठरवले आहे. त्या दृष्टीने शिवसेनेने पावलंही उचलली आहेत. सोमय्या यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्यासाठी शिवसेनेची चाचपणी सुरु असल्याचे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले आहे.
मानहानीचा दावा केलेले खटले वर्षानुवर्षे चालतात. नंतर ते विस्मृतीस जातात. हा प्रकार टाळण्यासाठी सोमय्या यांच्या विरोधातील खटला जलदगती न्यायालयात चालवाता येईल का याचाही शिवसेनेकडून विचार केला जातोय. तशी विनंती न्यायालयाला करता येईल का?, याची शक्यताही शिवसेनेकडून तपासली जात आहे. याबाबत उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातील नामवंत वकिलांशी सल्लामसलत करण्यात येतेय. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्याने सांगितल्याप्रमाणे शिवसेनेच्या नेत्यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. मात्र, याबाबत उद्धव ठाकरेच अंतिम निर्णय घेतील असेही सांगण्यात येत आहे.
किरीट सोमय्या यांनी 8 जानेवारीला उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. इंग्रजांच्या काळातील 99 वर्षे करारावर देण्यात आलेल्या मुंबईतील जमिनी 999 वर्षे करण्यात आल्या. महाकाली मातेला विकण्यासाठी आणि या गुफा बिल्डर्सला दान करण्यासाठी ही कालमर्यादा 999 वर्षे केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. यावेळ त्यांनी याबाबतचे सर्व पुरावे असल्याचाही दावा केला होता.
सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी त्यांनी ठाकरे कुटुंबावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. अर्णव गोस्वामी अटक प्रकरणात किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला होता. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि वास्तू सजावटकार अन्वय नाईक यांच्यात आर्थिक व्यवहार झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील रेवदंडा नजिकच्या किल्ला कोर्लई इथे रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन घेतली, असा दावा किरिट सोमय्या यांनी केला होता. उद्धव ठाकरे यांनी हा व्यवहार का लपवला? मुख्यमंत्र्यांनी रेवदंडाजवळ जमीन का घेतली? असे अजून किती व्यवहार झाले आहेत? असा सवाल किरिट सोमय्या यांनी केला होता. त्याचबरोबर ठाकरे आणि नाईक कुटुंबात झालेल्या व्यवहाराची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली होती.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर आणखी एका भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. “अंधेरीत महाकाली लेणीजवळ 106 वर्षांपूर्वी रस्ता बनवण्यात आला आहे. मात्र, तरीदेखील या रस्त्याच्या बदल्यात उद्योगपती विनोद गोयंका, शाहिद बलवा आणि अविनाश भोसले यांच्या कंपनीला 74 कोटी रुपयांची भरपाई देण्याचा घाट घातला जात आहे. हा एक मोठा घोटाळा आहे”, असा दावा त्यांनी काही दिवसांपूर्वी केलाय.
दरम्यान, उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर दररोज आरोप होत असून हे आरोप जनतेच्या मनात संशय निर्माण करणारे आहेत. किरीट सोमय्या यांना सडेतोड उत्तर दिलं जात नसल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येही अस्वस्थता आहे. आगामी काळात मुंबई, नाशिक, औरंगाबाद या सारख्या महत्त्वाच्या शहरांच्या महानगरपालिका निवडणूक होत आहेत. या निवडणुकीत सोमय्या यांनी केलेल्या आरोपांचे विरोधक भांडवल करु शकतात. भाजपला या निवडणुकीत कोणत्याही अपप्रचाराची संधी मिळता कामा नये असे शिवसेनेतील मंत्री आणि इतर नेत्यांचे मत आहे. त्यामुळे सोमय्या यांच्याविरोधात मानहानीचा दावा करावा का?, याबाबत शिवसनेकडून चाचपणी केली जात आहे.
संबंधित बातम्या :
शिवसेनेचा भगवा हिरवा झाला आहे का; किरीट सोमय्यांचा सवाल
मृत व्यक्तीची संपत्ती नावावर करण्यासाठी उद्धव ठाकरेंचा ग्रामपंचायतीवर दबाव; सोमय्यांचा आरोप
(Shivsena is thinking to file defamation case against BJP leader Kirit Somaiya)