Arjun Khotkar | अर्जुन खोतकर यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींबा, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून निघालं पत्रक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली येथील कार्यालयात खासदारांच्या बैठकीत अर्जुन खोतकर यांनी शिंदे गटात शामिल होण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुंबईः जालन्याचे माजी मंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या कार्यालयातूनच अशा आशयाचं पत्रक जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे जालन्याचे शिवसेना नेते अर्जुन खोतकर एकनाथ शिंदे गटात येण्याच्या चर्चांना दुजोरा मिळाला आहे. नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, इतर खासदारांसह रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि अर्जुन खोतकर आदींच्या बैठकीची एक व्हिडिओ क्लिप दोन दिवसांपासून व्हायरल झाली आहे. आज सकाळपर्यंतदेखील अर्जुन खोतकर हे शिंदे गटात शामिल होण्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र खोतकर यांनी उघडपणे आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातूनच सदर चर्चांना पूर्णविराम देण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप युतीतून सत्तेत आलेल्या सरकारला अर्जुन खोतकर यांनी पाठिंबा दिल्याचे पत्र जारी करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाचे पत्र काय?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या पत्रातील मजकूर असा, …’ जालन्याचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी आज दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपला पाठिंबा जाहीर केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण अंगिकरून एकनाथ शिंदे यांनी आपली वाटचाल सुरु केली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे-फडणवीसांचे हात भक्कम करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या शिवसेना-भाजप युती सरकारला पाठींबा देत असल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खासदार राहुल शेवाळे, रोहिदास लोखंडे, खासदार हेमंत पाटील, खासदार प्रतापराव जाधव, खासदार धैर्यशील माने, खासदार कृपाल तुमाने आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत हे उपस्थित होते.
दानवेंशी दिलजमाई?
जालना लोकसभा निवडणुकांच्या वेळी भाजपचे रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्यात वादाला सुरुवात झाली होती. 2019 ची निवडणूक कोण लढवणार यावरून हा वाद पेटला होता. त्यावेळी भाजप आणि शिवसेना युतीच्या आधारे निवडणूक लढवण्याचे ठरल्यानंतर अर्जून खोतकर यांनी माघार घेतली होती. त्यानंतरही खोतकर-दानवेंदरम्यान वाद वाढतच गेले. खोतकर यांच्याविरोधात ईडीने चौकशी सुरु केल्यानंतर यामागे रावसाहेब दानवेच असल्याचा आरोप खोतकर यांनी केला होता. मात्र आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात आज शिंदे यांनी आपल्यात समेट घडवून आण्याची माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली.