बिहार निवडणुकीत 50 पेक्षा जास्त जागा लढवा, शिवसेना नेत्यांची संजय राऊतांकडे मागणी

| Updated on: Oct 02, 2020 | 12:44 PM

बिहारचे शिवसेना प्रमुख हौसलेंद्र शर्मा यांनी संजय राऊतांची भेट घेतली. अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील, असे संजय राऊत यांनी नेत्यांना सांगितले.

बिहार निवडणुकीत 50 पेक्षा जास्त जागा लढवा, शिवसेना नेत्यांची संजय राऊतांकडे मागणी
Follow us on

मुंबई : शिवसेनेने बिहार विधानसभा निवडणूक (Bihar Vidhansabha Polls) लढवावी, यासाठी स्थानिक नेत्यांनी पक्षाकडे आग्रह धरला आहे. बिहारमधील शिवसेना नेत्यांनी मुंबईत येऊन सेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट घेतली. शिवसेना आपल्या विचारधारेपासून कधीही यूटर्न घेत नाही. जे या विचारधारेशी सहमत असतील ते आमच्यासोबत येऊ शकतात, असे बिहारचे शिवसेना प्रमुख हौसलेंद्र शर्मा यावेळी म्हणाले. (Shivsena leaders meets Sanjay Raut requests Party to contest Bihar Vidhansabha Election)

शिवसेनेने बिहार विधानसभा निवडणुकीत उतरावे आणि 50 पेक्षा जास्त जागा लढवाव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे. बिहारचे शिवसेना प्रमुख हौसलेंद्र शर्मा यांनी संजय राऊतांची भेट घेतली. राऊत यांनी बिहारमधील पदाधिकाऱ्यांची मागणी ऐकून घेतली. अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील, असे संजय राऊत यांनी नेत्यांना सांगितले.

बिहार विधानसभा निवडणूक शिवसेना याआधीही लढवत होती, त्यामुळे यावेळीही रिंगणात उतरण्याबाबत निर्णय घेऊ, असं संजय राऊत यांनी चार दिवसांपूर्वीच माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं होतं.

हौसलेंद्र शर्मा काय म्हणाले?

भूमिपुत्रांचा विकास आणि प्रखर राष्ट्रवाद हे मुद्दे घेऊन शिवसेनेची स्थापना झाली होती त्याच मुद्द्यांवर निवडणूक लढवली जाईल.

आमचे भूमिपुत्र रोजगारासाठी कश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत गेलेले आहेत.

बिहार शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन 50+ जागा लढवण्याची आग्रही मागणी केलीय. ती घेऊन आम्ही मुंबईत आलो आहोत. निर्णय पक्षप्रमुख घेतील.

शिवसेनेने 2015 मध्ये 88 जागा लढवल्या होत्या.

शिवसेना आपल्या विचारधारेपासून कधीही यूटर्न घेत नाही. जे या विचारधारेशी सहमत असतील ते आमच्यासोबत येऊ शकतात. अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील.

सुशांतसिंह प्रकारणात जे घाणेरडं राजकारण झालं, शिवसेनेला टार्गेट केलं गेलं. त्यावेळी शिवसेना नेत्यांनी जी भूमिका मांडली ती आज खरी होत असताना दिसत आहे.

गुप्तेश्वर पांडे हे पोलीस प्रमुखापेक्षा JDU च्या नेत्यासारखे वागले हे आरोप खरे होत आहेत

सुशांतसिंहचा फोटो आपल्या प्रचार पोस्टरवर लावून भाजपने आपलं घाणेरडं राजकारण सिद्ध केलं आहे

आजही बिहारचे मूळ लोक मूळ प्रश्नांवर निवडणूकीत चर्चा हवी

सर्व पोलीस हे देशाचे पोलीस आहेत. महाराष्ट्राच्या पोलिसांना बदनाम केलं गेलं, ज्याचा मी त्यावेळी कठोर शब्दांत निषेध केला.

फडणवीस भाजपचे बिहार प्रभारी

दरम्यान, बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसंच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर भाजपने नवी जबाबदारी टाकली आहे. भाजपने देवेंद्र फडणवीस यांची बिहारच्या प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. (Shivsena leaders meets Sanjay Raut requests Party to contest Bihar Vidhansabha Election)

देवेंद्र फडणवीस यांची अधिकृतरित्या बिहारच्या प्रभारीपदी नियुक्ती होताच त्यांनी बिहार जिंकण्याचा इरादा बोलून दाखवला. “भारतीय जनता पक्षाने माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. त्या जबाबदारीला निश्चित न्याय देण्याचा प्रयत्न करेन, असं म्हणत यंदाच्या निवडणुकीत एनडीए बहुमताने जिंकेल”, असा दावा फडणवीस यांनी केला.

प्रकाश आंबेडकरही मैदानात

वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमच्या युतीला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला, भविष्यात असा प्रयत्न परत करु. जे महाराष्ट्रात घडलं नाही, ते बिहारमध्ये घडवून आणू, असा विश्वास प्रकाश आंबेडकरांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केला होता. एनडीएच्या सरकारला सत्तेत येऊ न देणे, हा बिहारमध्ये निवडणूक लढवण्याचा एकमेव उद्देश आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे महाराष्ट्रात भिडणारे शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीसारखे पक्ष बिहारच्या रिंगणातही एकमेकांना टक्कर देताना दिसतील.

बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगुल

बिहार विधानसभेसाठी एकूण तीन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 28 ऑक्टोबर, दुसऱ्या टप्प्यात 3 नोव्हेंबर आणि तिसऱ्या टप्प्यात 7 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून निवडणुकीचा निकाल 10 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील आरोडा यांनी ही घोषणा केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदारांना मतदान करण्यासाठी एका तासाचा अधिक वेळ देण्यात आलेला आहे.

संबंधित बातम्या :

बिहार जिंकणारच, प्रभारीपदी नियुक्ती होताच देवेंद्र फडणवीसांचा एल्गार

MIM सोबत युतीने महाराष्ट्रात सुरुवात, आता देशात नवे राजकीय समीकरण, बिहार निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांचा एल्गार

(Shivsena leaders meets Sanjay Raut requests Party to contest Bihar Vidhansabha Election)