फडणवीसांचे सरकार गेले आणि फसवणाऱ्यांचे सरकार आले, मुनगंटीवारांचा हल्लाबोल

| Updated on: Nov 28, 2020 | 3:55 PM

भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आज ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. (sudhir mungantiwar attacks thackeray government)

फडणवीसांचे सरकार गेले आणि फसवणाऱ्यांचे सरकार आले, मुनगंटीवारांचा हल्लाबोल
Follow us on

नागपूर: ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकार विरोधात विरोधकांच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आज ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. फडणवीसांचं सरकार गेलं आणि फसवणाऱ्यांचे सरकार आले, अशा शब्दांत मुनगंटीवार यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. (sudhir mungantiwar attacks thackeray government)

सुधीर मुनगंटीवार यांनी आज नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन सरकारवर तोफ डागली. महाविकास आघाडी सरकारने 365 दिवसांत जनतेच्या अपेक्षांचा मोठा भंग केला आहे. त्यामुळेच या सरकारचा खरा चेहरा जनतेला दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. गेल्यावर्षी देवेंद्र फडणवीसांचं सरकार गेलं आणि फसवणाऱ्यांचं सरकार आलं. त्यामुळे राज्यात वर्षभरातच जंगलराज निर्माण झालं आहे, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.

महाविकास आघाडी सरकारकडून चांदा ते बांदाच्या लोकांना न्याय प्राप्त होईल, अशी अपेक्षा होती. सरकारने हा अपेक्षाभंग केला आहे, असं सांगतानाच मंत्रिमंडळाची यादी आपण वाचतो. तेव्हा पहिलं नाव U पासून सुरु होतं आणि शेवटचं नाव आदिती सुनील तटकरे म्हणजे A वर संपतं. जशी बाराखडी मंत्रिमंडळात उलटी झाली तसं यांचं कामंही उल्टं झालंय. उलट्या बाराखडी सारखं एक वर्ष उलटंसुलटं काम करणारं सरकार आपण अनुभवतोय, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

तुम्ही फक्त मंत्रिपदाच्या पाट्या लावायच्या का?

लोकमान्य टिळकांचं एक वाक्य प्रसिद्ध होतं, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? आज सरकारचे निर्णय जेव्हा आपण बघतो, तेव्हा आज टिळक असते तर त्यांनीच सरकारचे डोकं ठिकाणावर आहे का? असा प्रश्न विचारला असता, असं मुनगंटीवार म्हणाले. एक वर्षात त्यांची कोणतीही मुलाखत बघा, भाष्य ऐका, आर्यभट्टांनी शून्याचा शोध लावला. पण राज्य सरकारचं कार्य शून्य आहे. जे काही करायचं ते केंद्र सरकारनेचं हा शोध या सरकारने लावला, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

प्रत्येक मंत्री आपलं अपयश झाकण्यासाठी केंद्र सरकारने जीएसटीची रक्कम दिली नसल्याची बोंब मारत आहे. वीजबील माफ करायचं असेल तर केंद्र सरकारने पैसे द्यावेत, अशी मागणी या सरकारकडून केली जात आहे. मग तुम्ही फक्त मंत्रिपदाच्या पाट्या लावायच्या. तुमचं काम काय?, असा खणखणीत सवालही त्यांनी केला. (sudhir mungantiwar attacks thackeray government)

 

संबंधित बातम्या:

केंद्राकडील GST ची थकबाकी न मिळाल्याने विकासाची गती मंदावली, धनंजय मुंडेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल

धमकावणारा मुख्यमंत्री इतिहासात पाहिला नाही, देवेंद्र फडणवीसांचा थेट उद्धव ठाकरेंवर हल्ला

मुख्यमंत्र्यांची मुलाखत एक दिवस आधी आली हे बरं झालं, नाहीतर तो न्यायालयाचा अवमान ठरला असता : फडणवीस

(sudhir mungantiwar attacks thackeray government)