महाराष्ट्राला लागलेली धूळ आणि घाण पाऊस वाहून नेईल : अविनाश जाधव

आज पडणारा पाऊस हा राज्यातील घाण आणि महाराष्ट्राला लागलेली धूळ वाहून जाण्यासाठी पडत असल्याचं वक्तव्य मनसेचे ठाण्यातील उमेदवार अविनाश जाधव यांनी केलं.

महाराष्ट्राला लागलेली धूळ आणि घाण पाऊस वाहून नेईल : अविनाश जाधव
Anish Bendre | Edited By: SEO Team Veegam | Updated on: Oct 21, 2019 | 2:14 PM

ठाणे : ठाणे विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. राज्याला लागलेली घाण आणि महाराष्ट्रातील धूळ वाहून जाण्यासाठी पाऊस पडत आहे, असं मत अविनाश जाधव (Thane MNS Avinash Jadhav) यांनी व्यक्त केलं.

गेल्या पाच वर्षांत ठाणेकरांना आमदार दिसले नाहीत. त्यांनी काही कामं केलेली नाहीत. त्यामुळे मतदारांमध्ये एक राग आहे, रोष आहे. तो चेहऱ्यावर दिसतोय. त्यामुळे बदल नक्की होईल, अशी आशा अविनाश जाधव यांनी ‘टीव्ही9 मराठी’ शी बोलताना व्यक्त केली.

आज पडणारा पाऊस हा राज्यातील घाण आणि महाराष्ट्राला लागलेली धूळ वाहून जाण्यासाठी पडत असल्याचं वक्तव्यही जाधव यांनी केलं. ठाणेकरांनी जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहनही अविनाश जाधव यांनी यावेळी केलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबई-ठाण्यासह राज्यभरात पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. पावसाचा मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची भीतीही व्यक्त केली जात होती.

‘मराठी माणसाच्या विकासासाठी, मराठी माणसाच्या पाठी खंबीर उभे राहण्यासाठी मला मतदान करा. ठाण्यात कुठल्याही प्रकराचं काम झालं नाही. जो माणूस पाच वर्ष दिसला नाही, तो पुढची पाच वर्षं काय काम करणार आहे. नागरिकांनी माझा आवाज बुलंद करण्यासाठी मला मतदान करा.’ असंही आवाहन अविनाश जाधव (Thane MNS Avinash Jadhav) यांनी केलं.

विधानसभा निवडणूक : 36 जिल्ह्यातील 101 लक्षवेधी लढती

ठाणे मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार संजय केळकर यांना महायुतीने रिंगणात उतरवलं आहे. त्यांच्याविरोधात मनसेने अविनाश जाधव यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीने या मतदारसंघात उमेदवार न देता
मनसेला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे सर्वपक्षीय ताकद पाठीशी असलेल्या अविनाश जाधव यांना मतदार कौल देतात का, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

Follow Us