अर्णव गोस्वामींच्या जीवाला धोका असल्यामुळे राज्यपालांना गृहमंत्र्यांशी बोलावे लागले: राम कदम

| Updated on: Nov 09, 2020 | 2:56 PM

अर्णव गोस्वामी यांना तुरुंगात योग्यप्रकारे वागणूक देण्यात यावी. | Ram Kadam

अर्णव गोस्वामींच्या जीवाला धोका असल्यामुळे राज्यपालांना गृहमंत्र्यांशी बोलावे लागले: राम कदम
Follow us on

नवी मुंबई: रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी (Arnab Goswami ) यांच्या जीवाला धोका असल्यामुळेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करावा लागला. राज्यपालांना अशाप्रकारे राज्याच्या गृहमंत्र्यांना फोन करावा लागतो, हा महाराष्ट्र सरकारचा नाकर्तेपणा आहे, अशी टीका भाजप आमदार राम कदम यांनी केली. (Ram Kadam slams Maharashtra govt over Arnab Goswami arrest)

अर्णव गोस्वामी यांच्या सुटकेसाठी गेल्या काही दिवसांत राम कदम यांनी उपोषणापासून ते पदयात्रा असे सर्व उपाय करुन पाहिले आहेत. अखेर आज राम कदम नवी मुंबईच्या तळोजा येथील कारागृहात अर्णव गोस्वामी यांची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांना ही भेट नाकारण्यात आली. यानंतर राम कदम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मी तळोजा तुरुंगात कारागृह अधीक्षकांची भेट घेतली. अर्णव गोस्वामी यांना तुरुंगात योग्यप्रकारे वागणूक देण्यात यावी. कायदा हातात घेतला जाणार नाही किंवा कुठल्याही प्रकारे मानवाधिकारांचे उल्लंघन होता कामा नये, असे मी तुरुंग प्रशासनाला सांगितले.


अर्णव गोस्वामी यांच्या केसालाही धक्का लागला तर जनता त्यांच्या पाठिशी आहे. हे सरकार पत्रकारांचा गळा दाबू शकत नाही. हे सरकार मला अर्णव गोस्वामी यांना भेटून देत नाही तर मग सामान्य जनतेचे काय, असा सवाल यावेळी राम कदम यांनी उपस्थित केला.

अर्णव गोस्वामी यांना अटक झाल्यापासून भाजप नेते त्यांना जामीन देण्याची सातत्याने मागणी करत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेटही घेतली होती. यानंतर आज लगेचच राज्यपालांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी दुरध्वनीवरून चर्चाही केली.

त्यावेळी अर्णव गोस्वामी यांची सुरक्षा आणि आरोग्याबाबत राज्यपालांनी चिंता व्यक्त केली. अर्णव गोस्वामी यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटून दिले जावे, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय, अर्णव गोस्वामी यांच्या घरात ज्याप्रकारे पोलिसांचा फौजफाटा शिरला आणि त्यांना अटक करण्यात आली, याविषयीही राज्यपालांनी गृहमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केल्याचे समजते.

संबंधित बातम्या:

राज्यपालांनी अर्णव गोस्वामींची चिंता करु नये, सरकार त्यांची योग्यप्रकारे काळजी घेतेय: भुजबळ

मी अर्णव गोस्वामींना जेलमध्ये भेटायला जाणारच, हिंमत असेल तर अडवून दाखवा; राम कदमांचे खुले आव्हान

(Ram Kadam slams Maharashtra govt over Arnab Goswami arrest)